चिपळूण : हवामान विभागाने रत्नागिरी जिल्ह्यासाठी दिलेल्या इशाऱ्यानुसार मुसळधार वृष्टी सुरू असून, नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होत आहे. १९ जुलै रोजी सकाळी १०.३० वाजताच्या स्थितीनुसार, चिपळूणमध्ये वाशिष्ठी नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. चिपळूण शहरातील नाईक कंपनी/मच्छी मार्केट, वडनाका, मुरादपूर येथील काही ठिकाणी एक फूट पाणी भरलेले आहे.
चिपळूण नगरपालिकेच्या बोटी सांस्कृतिक केंद्र, शंकरवाडी, बाजारपेठ विसर्जन घाट, एसटी स्टँड, नगरपालिका कार्यालय या पाच ठिकाणी ठेवण्यात आलेल्या आहेत. तसेच, नगरपालिका पथके नऊ ठिकाणी तैनात आहेत. सध्या शिंदे या एका कुटुंबातील तीन व्यक्तींना स्थलांतरित करण्यात आले आहे.
तलाठी, पोलीस व एनडीआरएफची पथके शहरात सहा ठिकाणी तैनात केलेली आहेत. एका पथकात पाच तलाठी, तीन पोलीस व तीन जवान आहेत. या पथकासोबत एकूण चार बोटी आहेत. ही सहा ठिकाणे अशी – नाईक कंपनी, ओसवाल शॅापी, वडनाका, मुरादपूर, सांस्कृतिक केंद्र, पेठमाप.
दरम्यान, परशुराम घाटातील वाहतूक सुरळीत सुरू असून, कोणतीही समस्या नाही. कुंभार्ली घाटात दरड कोसळली होती. तेथील दरड बाजूला करण्याचे काम सुरू असून, आता दोन्ही बाजूंनी वाहतूक सुरू आहे.
कोकण रेल्वेमार्गावर कोणतीही समस्या नाही. त्यामुळे रेल्वे वाहतूक सुरळीत सुरू आहे, अशी माहिती रत्नागिरी जिल्हा माहिती कार्यालयाने दिली आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

