रत्नागिरी : गेल्या वर्षी टीबी अर्थात क्षयरोगमुक्त ग्रामपंचायती म्हणून निवड झालेल्यापैकी कापडगाव, झरेवाडी, पावस, टिके, टेंभ्ये या ग्रामपंचायतींच्या सरपंचांना प्रशस्तिपत्रक आणि सन्मानचिन्ह/पदक देऊन आज प्रातिनिधिक स्वरूपात गौरवण्यात आले. रत्नागिरीच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात आज (२४ मार्च) जागतिक क्षयरोग दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात हा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमात जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर भास्कर जगताप, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर महेंद्र गावडे, मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रश्मी आठल्ये, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. अंकुश शिरसाट, वैद्यकिय अधिकारी डॉ. ज्योत्स्ना वाघमारे, जिल्हा क्षयरोग विभागाचे आणि जिल्हा रुग्णालयाचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. या वेळी मान्यवरांनी क्षयरोगाबद्दल माहिती दिली. क्षयरोग जनजागृतीसाठी घेण्यात आलेल्या रांगोळी, निबंध, चित्रकला आदी स्पर्धांमध्ये १२० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यात यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. जिल्हा रुग्णालयातील क्षयरोग कक्ष आणि बालरुग्ण कक्षात रुग्णांना फळवाटप करण्यात आले. आरोग्य कर्मचाऱ्यांनी शहरात क्षयरोग जनजागृतीपर प्रभातफेरी काढली. पथनाट्यही सादर करण्यात आले.


