प्रलंबित मागण्यांसाठी रत्नागिरीत शिक्षकांचा मोर्चा आणि धरणे आंदोलन

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा प्राथमिक शिक्षक समन्वय समितीने आज (९ जुलै) रत्नागिरीत जिल्हा परिषदेच्या शाळा बंद ठेवून आपल्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी मोर्चा काढून धरणं आंदोलन केलं. टीईटी परीक्षा रद्द करून सेवा संरक्षण द्यावं, बीएलओ ड्युटी आणि अशैक्षणिक कामं रद्द करावीत, शिक्षकांना फक्त शिकवण्याचं काम द्यावं, रिक्त पदं तातडीने भरावीत, जुनी पेन्शन योजना लागू करावी, शिक्षण सेवक कालावधी रद्द करावा, पदोन्नतीविषयीच्या अन्यायकारक अटी रद्द कराव्यात आणि संचमान्यतेचं चुकीचं धोरण रद्द करावं, अशा विविध मागण्या शिक्षकांनी केल्या आहेत. दुपारी १२ वाजता रत्नागिरी शहरातल्या माळनाका इथून सुरू झालेला मोर्चा जिल्हा परिषद कार्यालयावर नेण्यात आला. तिथे धरणं धरून सहभागी शिक्षकांनी घोषणा देऊन निदर्शनं केली. जिल्ह्यातल्या जवळपास १६ प्रमुख संघटनांनी या आंदोलनात सहभाग घेतला होता. यानंतर शिष्टमंडळाने जिल्हा प्रशासनाकडे आपल्या मागण्याचं निवेदन सादर केलं. योग्य दखल घेतली न गेल्यास संपूर्ण राज्यात हे आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही या वेळी देण्यात आला.

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply