रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या ४० तासांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जवळपास सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. सुरक्षिततेचा उपाय म्हणून मुंबई-गोवा महामार्गावर काही ठिकाणी वाहतूक थांबविण्यात आली आहे.

बुधवारी (पाच ऑगस्ट) सकाळी बावनदीने धोक्याची पातळी ओलांडली. बावनदीच्या पुराचे पाणी कोळंबे-परचुरी पुलावरून वाहू लागले. कोळंबे-परचुरीला जोडणारा पूलच पाण्याखाली गेल्याने परचुरी गावाचा संपर्क तुटला. परचुरीतील अनेक ग्रामस्थ गावात अडकून पडले आहेत. तसेच, बावनदीला आलेल्या पाण्याने वांद्री बाजारपेठेत शिरकाव केला आहे. तेथील ग्रामदेवता मंदिराला पाणी टेकले असून, ग्रामस्थांची धावपळ उडाली आहे. पाण्याचा जोर वाढत असल्याने अनेकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येत आहे, असे वृत्त संगमेश्वर न्यूजने दिले आहे. (वरील फोटोत : बावनदीचा पूर)
खेडमधील जगबुडी नदी इशारा पातळीवर वाहत आहे. तेथील इशारा पातळी सहा मीटर असून, धोक्याची पातळी सात मीटर आहे. सध्या प्रवाह ६.७५ मीटरवर आहे.
इतर नद्यांची स्थिती खालीलप्रमाणे आहे. कंसातील आकडे अनुक्रमे धोका पातळी व इशारा पातळीचे आहेत. चिपळूण – वाशिष्ठी ४.८८ मी. (५ मी. व ७ मी.), लांजा – काजळी १८.३४ (१६.५ मी व १८ मी.) राजापूर – कोदवली ८.२० (४.९० मी व ८.१३ मी), खेड – जगबुडी ६.७५ मी. (६ मी व ७ मी.), संगमेश्वर – शास्त्री ६.४० मी. (६.२० मी. व ७.८० मी.), संगमेश्वर – सोनवी ६.२० मी. (७.२० मी व ८.६० मी.), लांजा – मुचकुंदी २.४० मी. (३.५० मी व ४.५० मी.), संगमेश्वर – बावनदी ११.८० मी. (९.४० मी व ११ मी.)
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड