रत्नागिरी : रत्नागिरी नगर राजभाषा कार्यान्वयन समितीला राजभाषेचा प्रथम क्रमांकाचा सर्वोच्च ‘राजभाषा कीर्ती’ पुरस्कार मिळाला आहे. गुजरातमधील सुरत येथे या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.
हिंदीचा प्रचार-प्रसार कार्य करणाऱ्या संस्थांना केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयांतर्गत राजभाषा विभागद्वारे राजभाषा कीर्ति हा सर्वोच्च पुरस्कार दिला जातो. हिंदी प्रचार-प्रसारासाठी स्थापन झालेल्या रत्नागिरी नगर राजभाषा कार्यान्वयन समितीला गेल्या वर्षीचा राजभाषा कीर्ती पुरस्कार भारत प्रदान करण्यात आला. या पुरस्काराचे वितरण राजभाषा दिनी सुरतमध्ये अखिल भारतीय राजभाषा संमेलनात करण्यात आले.
रत्नागिरी नगर राजभाषा कार्यान्वयन समितीने विविध क्षेत्रात हिंदीच्या प्रसाराचे काम केले. तसेच शाळा, महाविद्यालयात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले. समितीकरिता बँक ऑफ इंडियाच्या विभागीय कार्यालयाने स्वतंत्र कार्यालय तसेच हिंदी, मराठी पुस्तकांचे वाचनालय सर्व कर्मचाऱ्यांकरिता उपलब्ध करून दिले आहे. समितीच्या नियोजनाचे कार्य बँक ऑफ इंडियाच्या विभागीय कार्यालयाकडे सोपविले आहे. सध्याचे समितीचे अध्यक्ष संतोष सावंतदेसाई यांनी हा सर्वोच्च पुरस्कार गृह मंत्री अमित शाह यांच्या उपस्थितीत केंद्रीय रेल्वे राज्य मंत्री श्रीमती दर्शना जरदोश यांच्या हस्ते स्वीकारला. यावेळी गृह राज्य मंत्री अजय कुमार मिश्रा आणि गृह राज्य मंत्री निशिथ प्रामाणिक उपस्थित होते.
हा पुरस्कार रत्नागिरी शहरातील केंद्र सरकारी कार्यालये, विमा कंपन्या तसेच बँकांच्या कार्यालयांनी केलेल्या हिंदीच्या कार्याचा गौरव असल्याचे मत समितीचे अध्यक्ष श्री. सावंतदेसाई यांनी व्यक्त केले. मराठी भाषेला संपर्क भाषा हिंदीची जोड देऊन ग्राहक आधार वाढवून व्यवसाय वृद्धी करावी आणि कोणत्याही योजनेची माहिती जनतेला ग्राहकाच्या भाषेत दिली जाईल, याकडे लक्ष द्यावे, असे मनोगत त्यांनी व्यक्त केले. समितीतर्फे राजभाषा रत्नसिंधू अर्धवार्षिक हिंदी पत्रिका आणि प्रेरणा ही ई पत्रिका प्रकाशित केली जाते. तसेच समितीची स्वत:ची वेबसाइटही आहे.


