कोकणात दहा हजार बहुराष्ट्रीय कंपन्यांची नोंदणी – मुख्यमंत्री

* “शासन आपल्या दारी”योजनेचा प्रारंभ * कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन * लोकमान्य टिळक स्मारक शासकीय ग्रंथालयाचे नूतनीकरण

रत्नागिरी : कोकणात दहा हजार बहुराष्ट्रीय कंपन्यांनी नोंदणी केली आहे. त्यातून राज्यातील बेरोजगारांना रोजगार उपलब्ध होईल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी येथे व्यक्त केला.

रत्नागिरी जिल्ह्यातील “शासन आपल्या दारी” या लोकाभिमुख योजनेचा प्रारंभ श्री. शिंदे यांच्या हस्ते गुरुवारी (दि. २५ मे) रत्नागिरीत प्रमोद महाजन क्रीडा संकुलावरील भव्य शामियान्यात झाला. त्यावेळी ते बोलत होते.

मुख्यमंत्र्यांच्या रत्नागिरी दौऱ्यात “शासन आपल्या दारी”योजनेचा प्रारंभ, कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन आणि लोकमान्य टिळक स्मारक शासकीय ग्रंथालयाच्या नूतनीकृत वास्तूचे उद्घाटन करण्यात आले. जिल्हा पोलिसांना विविध वाहनांचे वितरणही मुख्यमंत्र्यांनी एका कार्यक्रमात केले.

“शासन आपल्या दारी” योजनेचा प्रारंभ करण्याच्या कार्यक्रमात बोलताना श्री. शिंदे म्हणाले, माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्यातील किमान एक लाख लाभार्थ्यांना शासन योजनेचा लाभ प्रत्यक्ष स्वरूपात देण्यात येईल. आपला उद्देश प्रामाणिक असला म्हणजे सर्व बाजूंनी लोक सोबत जोडले जातात. “शासन आपल्या दारी” हे अभियान देशात विक्रमी ठरेल आणि महाराष्ट्राचे उदाहरण देशासमोर राहील याची मला खात्री आहे. “शासन आपल्या दारी” हे एक क्रांतिकारी अभियान राज्यात सुरू झाले आहे. गेल्या १३ मे रोजी पाटण (जि. सातारा) येथून संपूर्ण राज्यात या अभियानाची सुरुवात झाली. केवळ बारा दिवसांत लाखो लाभार्थींची नोंद यात होत आहे, हे विशेष आहे. या अभियानाचे काम आम्ही कुठल्या तरी एका विभागावर सोपवून बसलेलो नाही. मुख्यमंत्री सचिवालयाचे यावर पूर्ण नियंत्रण आणि देखरेख आहे. माझे खासगी सचिव डॉ. अमोल शिंदे स्वत: त्यांच्या पथकासह दिवसरात्र, चोवीस तास हे अभियान व्यवस्थित पार पडते आहे किंवा नाही, याकडे लक्ष देत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक, वीर सावरकर या महापुरुषांची भूमी असलेल्या रत्नागिरीत शासन आपल्या दारी हा उपक्रम यशस्वीरीत्या राबविण्यात येत आहे, याचा आनंद आहे.

श्री. शिंदे म्हणाले, या अभियानाचा फायदा अधिकाधिक लोकांना व्हावा म्हणून आता माहिती तंत्रज्ञानाची मदत पण यात घेतो आहोत. महालाभार्थी या पोर्टलवर नोंदणी करून योजनांचा लाभ घेता येईल. जिल्ह्यातील एमएससी आयटी केंद्रे, सीएससी केंद्रे तसेच कॉम्प्युटर ट्रेनिंग इन्स्टिट्यूटमधून तेथील स्वयंसेवकांची मदत घेऊन नोंदणी करता येईल आणि योजनांचा लाभ घेता येईल. हे अभियान यशस्वी करण्यासाठी संपूर्ण प्रशासन यंत्रणा युद्धपातळीवर, फिल्डवर उतरली पाहिजे, अशा सर्व यंत्रणांना सूचना होत्या. आज ग्रामसेवक, तलाठी, प्रांत अधिकारी स्वत: गावोगावी जाऊन नागरिकांना भेटत आहेत आणि लाभ देत आहेत, योजनांची माहिती देत आहेत, असे सांगून मुख्यमंत्र्यांनी प्रशासकीय यंत्रणेचे कौतुक केले.

मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, सातारा जिल्ह्यात या अभियानाला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आहे. नगर जिल्हा तसेच ठाणे जिल्ह्यानेसुद्धा प्रेरणा घेत या अभियानासाठी नोंदणी शिबिरे घेतली आहेत. कल्याणमध्ये दीड लाख लाभार्थींना लाभ देत आहोत. गडचिरोलीसारख्या ठिकाणी दोन महिन्यांत एक लाख लाभार्थींची नोंद झाली आहे. प्रत्येक जिल्ह्यात ७५ हजार, तालुक्यात १५ हजार आणि गावात किमान १०० लाभार्थींना योजनांचा लाभ मिळालाच पाहिजे, यादृष्टीने सर्व तयारी झाली आहे. या अभियानासाठी १६ हजार योजनादूत नेमले आहेत. मुख्यमंत्री सचिवालयात जनकल्याण कक्ष सुरू करण्यात आला आहे. प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा जनकल्याण कक्ष सुरू केले आहेत.

राज्यकारभाराविषयी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, गेल्या अकरा महिन्यांत ३५ कॅबिनेट बैठका आणि त्यातून सर्वसामान्य माणसांच्या हिताचे ३५० निर्णय घेण्यात आले आहेत. सर्वसामान्य माणसांच्या आयुष्यात सुख-समाधानाचे दिवस यावेत, शासनाविषयी जनतेच्या मनात सकारात्मक भावना निर्माण व्हाव्यात, हा या योजनेमागचा मुख्य उद्देश आहे. शासन आणि प्रशासन ही रथाची दोन चाके आहेत. ही दोन्ही चाके विकास होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. एसटीच्या ५० टक्के सवलतीमुळे महिलांचा प्रवास वाढला वाढला आहे. ज्येष्ठांना दिलेल्या सवलतीमुळे ज्येष्ठांच्या प्रवासातही वाढ झाली आहे. एमएमआरडीएच्या धर्तीवर कोकण विकास क्षेत्र प्राधिकरणाच्या माध्यमातून कोकणाचा सर्वांगीण विकास साधण्यात येत आहे. केंद्रशासन यासाठी मदत करत आहे. मुंबई-गोवा महामार्गाचे काम लवकरच पूर्ण होत आहे. मुंबई-सिंधुदुर्ग महामार्ग तयार होणार आहे. त्यामुळे प्रवासाचा वेळ वाचेल, असेही त्यांनी सांगितले.

शासन आपल्या दारी या योजनेविषयी बोलताना पालकमंत्री उदय सामंत म्हणाले की, राज्याच्या जडणघडणीतला हा पहिला कार्यक्रम आहे, ज्यात अधिकारी गावोगावी, घरोघरी जाऊन योजना लोकांपर्यंत पोहोचवत आहेत. शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत, प्रत्येक वर्गाला लाभ मिळाला पाहिजे, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येतील. रिक्षाचालक आणि मालक यांच्यासाठी महामंडळाची स्थापना करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्याची अंमलबजावणी लवकरात लवकर होईल. संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावण बाळ योजना या योजनेपासून रत्नागिरी जिल्ह्यातील एकही लाभार्थी वंचित राहणार नाही, अशी ग्वाही पालकमंत्र्यांनी यावेळी दिली.

यावेळी बंदरे आणि खनिकर्म मंत्री दादाजी भुसे, उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, आमदार रवींद्र फाटक, माजी आमदार सदानंद चव्हाण, विशेष पोलीस महानिरीक्षक प्रवीण पवार, जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी आदी मान्यवरांसह व्यासपीठावर मोठ्या संख्येने लाभार्थी उपस्थित होते.

शासन आपल्या दारी या योजनेच्या शुभारंभासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहिलेल्या दिव्यांग लाभार्थ्यांना दुचाकी आणि तीन चाकी गाड्यांचे वाटप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी केले, तर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तिकिरण पुजार यांनी आभारर मानले. तत्पूर्वी शासन आपल्या दारी योजनेच्या संकल्पनेची सविस्तर माहिती डॉ. अमोल शिंदे यांनी दिली.

कौशल्य विकास केंद्राचा प्रारंभ

महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाने शासकीय तंत्रनिकेतन संस्थेच्या परिसरात निर्माण केलेल्या कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन श्री. शिंदे यांच्या हस्ते झाले. शासकीय तंत्रनिकेतन परिसरात कौशल्य विकास केंद्रामार्फत सुमारे २० विविध अभ्यासक्रम राबविले जातात. कृषीपूरक अभ्यासक्रम सुरू करण्याला या केंद्राने प्राधान्य द्यावे, अशी सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी केली.

सुमारे अर्धा एकर परिसरात केवळ सात महिन्यांत उभारण्यात आलेल्या या देखण्या इमारतीच्या बांधकामाचे कौतुक करून मुख्यमंत्री पुढे म्हणाले, महाराष्ट्र राज्य हे कृषीप्रधान राज्य आहे. शेतकऱ्यांचे जीवन सुखकारक करायला राज्य शासनाचे प्राधान्य आहे. राज्यातील विद्यार्थी, युवकांसाठी उद्योगधंद्यांच्या गरजांनुसार विविध व्यवसायाभिमुख अभ्यासक्रम राबविण्याचे शासनाचे धोरण आहे. या केंद्रातून अनेक गुणवंत विद्यार्थी निर्माण होतील, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.

प्रारंभी महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाचे संचालक प्रमोद नाईक यांनी संस्थेचे विविध अभ्यासक्रम व उपक्रमांबाबत मुख्यमंत्र्यांना माहिती दिली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी अत्यंत आत्मीयतेने उपस्थित विद्यार्थी- विद्यार्थिनींशी संवाद साधला.

यावेळी पालकमंत्री उदय सामंत, कृषी मंत्री दादा भुसे, शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य औदुंबर जाधव, अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सूरज खंते, कौशल्य विकास केंद्राच्या प्राचार्या गौरीनंदा सावंत, कौशल्य विकास केंद्राचे अभ्यास प्रमुख अक्षय पाटील यांच्यासह इतर प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

लोकमान्य टिळक स्मारक शासकीय ग्रंथालयाचे नूतनीकरण
रत्नागिरीच्या लोकमान्य टिळक स्मारक शासकीय विभागीय ग्रंथालयाच्या नूतनीकरण केलेल्या इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. ही वास्तू सांस्कृतिक विकासाचे केंद्र व्हावे, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली.

श्री. शिंदे म्हणाले, शासकीय विभागीय ग्रंथालयाची वास्तू हा ऐतिहासिक ठेवा आहे. ही वास्तू राज्याच्या सांस्कृतिक विकासाचे केंद्र व्हावे. रत्नागिरी ही ऐतिहासिक वारसा असलेली भूमी आहे. या भूमीने विनायक दामोदर सावरकर, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक अशी नररत्ने दिली आहेत. देशाच्या स्वातंत्र्यात या वीरांचे योगदान मोठ्या प्रमाणावर आहे. शासनाचे कोकणच्या विकासाकडे बारकाईने लक्ष असून कोकणच्या विकासाकरिता शासन कटिबद्ध आहे.

लोकमान्य बाळ गंगाधार टिळक यांच्या स्मरणार्थ राज्य शासनाद्वारे २० ऑक्टोबर १९७६ रोजी सुरू करण्यात आलेल्या शासकीय विभागीय ग्रंथालयाच्या जुन्या इमारतीचे नूतनीकरण, सुशोभीकरण आणि आधुनिकीकरण करण्यात आले आहे. सुमारे साडेचार कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेल्या या देखण्या वास्तूमध्ये सुमारे एक लाख १४ हजार ग्रंथसंपदा असून याचा ५० हून अधिक संशोधक अभ्यासक लाभ घेत आहेत. लोकमान्य टिळक स्मृतिशताब्दीनिमित्ताने पालकमंत्री उदय सामंत यांनी या वास्तूसाठी उच्च तंत्र शिक्षण विभागाकडून सुमारे ५ कोटी उपलब्ध करून दिले. या ग्रंथालयामुळे नागरिकांची वाचन संस्कृती जोपासण्यास मदत होईल. तसेच विपुल ग्रंथसंपदेमुळे याचा संदर्भ ग्रंथालय म्हणूनही उपयोग होईल, असे यावेळी सांगण्यात आले.

नव्या वास्तूच्या उद्घाटनप्रसंगी पालकमंत्री उदय सामंत, कृषी मंत्री दादा भुसे, आमदार रवींद्र फाटक आदी उपस्थित होते.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply