चिपळूण : बा. सी. मर्ढेकर यांच्या `गणपत वाणी` कवितेची गाजलेली ओळ घेऊन सद्यःस्थितीतील अभिव्यक्तीत मांडायला सांगणारी अभिनव समस्यापूर्ती राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
महाराष्ट्र साहित्य परिषद आणि कोकण मराठी साहित्य परिषदेची चिपळूण शाखा यांच्या पुढाकाराने ‘गणपत वाणी बिडी पिताना’ या कवितेवर ज्येष्ठ नाटककार अप्पासाहेब जाधव
स्मृतिप्रीत्यर्थ ही स्पर्धा होणार आहे.
स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या कवींना लेखनासाठी बा. सी. मर्ढेकर यांच्या ‘गणपत वाणी’ या कवितेतील “गणपत वाणी बिडी पिताना” ही पहिलीच ओळ देण्यात आली आहे. आजवरच्या साहित्य इतिहासात अशा प्रकारचा हा पहिलाच क्रियाशील प्रयोग आहे.
एखाद्या सर्वज्ञात कवीच्या गाजलेल्या कवितेची ओळ घेऊन त्याच्या मूळ कवितेपेक्षा अगदी वेगळ्या धाटणीच्या अभिव्यक्तीची कविता निर्माण करून त्यातून सद्यःस्थितीची विविधांगी मांडणी करणे आणि त्यातून चर्चित, अचर्चित समाज वास्तवाला भिडणे असे या संकल्पनेचे स्वरूप आहे. “गणपत वाणी बिडी पिताना” ही ओळ स्पर्धेसाठी सादर केल्या जाणाऱ्या प्रत्येक कवितेत किमान एकदा तरी येणे अपेक्षित आहे. काव्यलेखक स्पर्धकाने कवितेच्या सुरुवातीला ही ओळ वापरणे अधिक कसदार मानण्यात येईल. या ओळीशिवाय या कवितेमधील इतर दुसऱ्या कोणत्याही ओळीवर किंवा मर्ढेकरांच्या इतर कवितेवर किंवा इतर कवीच्या कोणत्याची कवितेवर केलेले संस्करण स्पर्धेसाठी ग्राह्य धरले जाणार नाही. नवीन तयार होणाऱ्या कवितेतील अभिव्यक्ती मूळ कवितेपासून जितकी दूर जाईल तितकी ती यशाच्या अधिक जवळ जाईल, असा या संकल्पनेमागील विचार आहे. मूळ कवितेच्या ढाच्याला, आशयाला, शब्दांना आणि विषयाला या नव्या रचनेने अधिक कलासक्त वैचारिक बैठकीने कलाटणी द्यावी. वर्तमानाचे संदर्भ, नावीन्य, डौल, आशयाची घनता या गोष्टींचेही भान राखावे असा विचार या स्पर्धेच्या आयोजनामागे आहे. स्पर्धेसाठी मूळ कवितेचे विडंबन तसेच कोणत्याही अन्य प्रकारची कविता वरील मुद्द्यांच्या आधारे स्पर्धेस पात्र राहील.
स्पर्धेसाठी अपेक्षित काव्य अभिव्यक्ती खालील प्रकारे साकार करावी.
गणपत वाणी बिडी पिताना
स्वत:तून वजा झाल्यासारखा
शून्यात पाहत राहिला
ऊर्ध्वगामी जात नष्ट होणाऱ्या
धूम्रवलयांकडे.
भयकंपित चेहऱ्याने पाहत राहिला
त्याच्या पोराने फ्लिपकार्टवरून
मागवलेल्या डझनभर वस्तूंकडे.
किंवा
गणपत वाणी बिडी पिताना
आडोशाला व्यथा आंधळी
सावरीत जी उभी कधीची
गलितगात्र खांद्यावर झोळी
गहन धुराचा ढीग साचला
भवतालावर-फडतालावर
उगाच वटवाघूळ फडफडते
धुरकटल्या काळ्या आढ्यावर.
किंवा
गणपत वाणी बिडी पिताना
शोधायाचा जात आपुली
विरत जाणाऱ्या धूरामधुनी
आणि शिल्लक थोटूक निरखत
उमजून घ्यायचा पत आपुली.
विजेत्यांना अनुक्रमे ५,००० रुपये, ३,००० आणि २,००० रुपये रोख, सरासरी प्रवास खर्च. प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह देण्यात येणार आहे. प्रत्येकी एक हजाराची पाच उत्तेजनार्थ पारितोषिकेही दिली जाणार आहेत.
स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील तीन वेगवेगळ्या प्रांतातून मान्यवर परिक्षक असतील. परीक्षकांनी कविता तसेच समीक्षा क्षेत्रात आजवर केलेले महत्त्वपूर्ण काम विचारात घेतले जाणार आहे. स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवण्यासाठी आपली कविता मोबाइलवर मराठी भाषेत टाइप करून आपले संपूर्ण नाव, पत्ता, मोबाइल नंबर आणि संपूर्ण परिचयासह पाठवावी. एका मोबाइल नंबरवरून एकच कविता स्वीकारण्यात येईल. कविता किती ओळींची असावी याला बंधन नाही. मात्र कविता कवितेएवढ्या लांबी-रुंदीची असावी. या स्पर्धेतील निवडक उत्तम कवितांचा संग्रह पुणे येथील प्रतिथयश प्रकाशन संस्थेकडून प्रसिद्ध करण्याचा आयोजकांचा मानस आहे. स्पर्धेसाठी कोणतेही प्रवेश शुल्क नाही. स्पर्धेसाठी कविता २६ ऑक्टोबर २०२५ पर्यंत पाठवाव्यात.
या अभिनव स्पर्धेत महाराष्ट्र राज्यातील जास्तीत जास्त कवींनी सहभाग घ्यावा, असे आवाहन मसाप शाखा अध्यक्ष संतोष गोनबरे आणि कोमसाप शाखा अध्यक्ष अरुण इंगवले यांनी केले आहे. स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या कवींनी आपल्या कविता धीरज वाटेकर (9860360948), दीपक मोने (9767504489), प्राची जोशी (9823521962) यांच्या व्हॉट्स अॅप नंबरवर पाठवावी.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

