गावचे मुख्यमंत्री काय करणार?

सरपंच हाच गावाचा मुख्यमंत्री असतो. त्यांनी त्यांची ताकद विधायक दृष्टीने वापरली तर गावाला अनेक बक्षिसे मिळू शकतात. त्या दृष्टीने सरपंचांनी काम करावे, अशी अपेक्षा पालकमंत्री उदय सामंत यांनी कार्यशाळेत व्यक्त केली. प्रत्यक्षात एखादा अपवाद वगळला तर गावाला दिशा देऊ शकेल अशा नेत्यांचीच अलीकडे वानवा आहे. मुळात त्यांना त्यांच्या कामाची जाणीवच नसते, असे म्हणण्यासारखी स्थिती आहे. त्यामुळेच मंत्र्यांनी आणि अधिकाऱ्यांनी अपेक्षा केलेली कामे त्यांच्याकडून होण्याची शक्यता धूसर बनते. राजकीय सोयी-गैरसोयी पाहून लोकप्रतिनिधी निवडले जातात. म्हणूनच आपल्याला निवडून आणून पदे बहाल करणाऱ्या मोठ्या नेत्यांची तळी उचलून धरण्यापलीकडे आपल्याला काही काम करायचे असते, याची त्यांना जाणीवच नसते. गावागावांमध्ये तसाच अनुभव येतो.

रोरोचा प्रयोग : उपयुक्त आणि फसलेला

मुंबईतून कोकणात येण्यासाठी अनेक पर्यायांप्रमाणेच रो-रोचे दोन प्रयोग गणेशोत्सवाच्या काळात साकारण्यात आले. रेल्वे आणि जलवाहतूक या दोन माध्यमांमधून हे प्रयोग साकारण्यात आले. मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे रखडलेले काम, त्यातूनही एसटी आणि खासगी वाहतुकीवर पडणारा ताण आणि कोकण रेल्वेच्या प्रवासी वहनक्षमतेच्या मर्यादा या पार्श्वभूमीवर हंगामात कोकणात येण्यासाठी पर्यायी मार्गाची आवश्यकता निर्माण झाली होती. त्यातूनच रेल्वे आणि जलवाहतुकीच्या पर्यायांची चाचपणी करण्यात आली. त्यापैकी जलवाहतुकीचा प्रयोग प्रत्यक्षात येण्याची शक्यता आहे. कोकण रेल्वेचा पर्याय मात्र तूर्त तरी पूर्णपणे फसलेला आणि अव्यवहार्य ठरला आहे.

आश्वासनांच्या पावसात वाहून गेले रस्ते

नेहमीच येणारा पाऊस, त्यामुळे कोकणवासीयांची उडणारी दाणादाण, नेहमीच येणारा गणेशोत्सव, त्या काळात चाकरमान्यांना भोगावा लागणारा त्रास वर्षानुवर्षे तसाच आहे. वाहतुकीच्या सुविधा पुरविण्याच्या आश्वासनांच्या पावसात रस्ते मात्र वाहून गेले आहेत. यापुढेही ते तसेच वाहत राहतील. सण संपवून चाकरमानी परततील. खड्डे विसरतील. अगदी दरवर्षी येणाऱ्या गणपतीप्रमाणेच पुन्हा पुढच्या वर्षी त्याच खड्ड्यांमधून कोकणात आपापल्या गावी येतील.

संस्मरणीय आणि आदर्श स्मृतिसोहळा

प्रथितयश लेखक जयवंत दळवी यांच्या स्मृतिशताब्दीचा नुकताच समारोप झाला. त्यांच्या आठवणी जपणारा कार्यक्रम त्यांचे मूळ गाव असलेल्या आरवली आणि परिसरात वर्षभर साजरा करण्यात आला. एखाद्या व्यक्तीची आठवण त्याच्या शंभराव्या वर्षात वर्षभर जपणारा असा एखादा कार्यक्रम अनोखाच आहे. सावंतवाडी आणि वेंगुर्ले या तालुक्यांमधील आरवलीच्या परिसरातील त्यांच्या चाहत्यांनी वर्षभर दळवींच्या स्मृती जागृत ठेवण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले. साहित्य प्रेरणा कट्टा ही आभासी संस्था आणि शिरोडा येथील रघुनाथ गणेश खटखटे या शतकमहोत्सवी ग्रंथालयाने हा उपक्रम राबविला. साहित्य रसिक आणि हे साहित्य जतन करणारी, रसिकांना ते पुरविणारी ग्रंथालयासारखी संस्था विधायक हेतूने एकत्र आली की किती उत्तम आदर्श निर्माण होऊ शकतो, हेच या संस्थांनी दाखवून दिले आहे.

खुल्या प्रवर्गातील आर्थिक दुर्बलांच्या उन्नतीसाठी ‘अमृतपेठ’ ठरेल वरदान; कमिशनविना पोर्टलवरून विक्री

‘खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांनी आपल्या पायावर उभे राहावे, त्यांच्यातूनही उद्योजक घडावेत आणि आजवर उपेक्षित राहिलेल्या या समाजघटकाची सर्वांगीण प्रगती व्हावी, यासाठी ‘अमृत’ ही संस्था सर्वतोपरी मदत करत आहे. ‘अमृतपेठ’ हे ई-कॉमर्स पोर्टल म्हणजे त्यातील एक क्रांतिकारी पाऊल असून, त्याद्वारे संबंधित गटातील अगदी लहानातील लहान उद्योजकालाही आपली दर्जेदार उत्पादने आणि सेवा कोणत्याही कमिशनविना सर्वत्र विकता येणार आहेत. म्हणूनच संस्थेच्या सर्वच योजनांचा जास्तीत जास्त जणांनी लाभ घ्यावा,’ असे आवाहन ‘अमृत’ या संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांनी रत्नागिरीत केले.

खुल्या प्रवर्गासाठीच्या योजनांची माहिती देण्यासाठी ‘अमृत’चा २१ ऑगस्टला रत्नागिरीत मेळावा

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्थेचा कोकण विभागातील पहिला अमृत मेळावा २१ ऑगस्ट रोजी रत्नागिरीत आयोजित करण्यात आला आहे. खासकरून खुल्या प्रवर्गातील नागरिकांना स्वयंरोजगार, शैक्षणिक प्रगती आणि स्वावलंबन यासाठी उपयुक्त ठरेल या अनुषंगाने हा महामेळावा होणार आहे.