महाराष्ट्रातील सध्याच्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर कवी विंदा करंदीकर यांची ‘तेच ते आणि तेच ते’ ही कविता नेहमीच आठवते. रोज नवे काही घडत असल्याचे भासत असले तरी त्यात फारसे काही वेगळे नसते. राजकारण्यांच्या खेळामध्ये पाच वर्षांनी एकदाच खेळल्यानंतर फेकून देण्याच्या लायकीची प्यादी म्हणूनच आपला उपयोग झाला आहे, हे आपल्याला समजत असते. खेळ त्यांचा होतो. आपला जीव जातो. ते पाहायला त्यांच्याकडे वेळ नसतो. अशा स्थितीत आपण काहीही करू शकत नाही. विंदा करंदीकरांची कविता आपण जगत असतो.