रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात करोना प्रतिबंधासाठी आठ जुलैपर्यंत लॉकडाउन घोषित करण्यात आलेले आहे; मात्र घरात एकटे राहणारे ज्येष्ठ नागरिक, तसेच नोकरीनिमित्ताने एकटे राहावे लागणारे अधिकारी आणि कर्मचारी यांच्या भोजनाची गैरसोय होऊ नये, यासाठी लॉकडाउनच्या आदेशामध्ये जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी थोडा बदल केला आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी ३० जून रोजी जाहीर केलेल्या आदेशातील परिशिष्ट बमध्ये बदल करण्यात आला आहे. त्यानुसार हॉटेलमधून देण्यात येणाऱ्या पार्सल सुविधेला मान्यता देण्यात आली आहे. सर्व हॉटेल व्यावसायिकांना कोविडच्या अनुषंगाने सर्व नियमांचे पालन करून खाद्यपदार्थ घरपोच देण्याची सुविधा देता येईल, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी आज जारी केलेल्या आदेशात म्हटले आहे.
……..