२० ऑगस्टपासून एसटीच्या सर्व सेवा टप्प्याटप्प्याने सुरू होणार; नियम पाळणे बंधनकारक

मुंबई : करोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे गेले पाच महिने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाची अर्थात एसटीची आंतरराज्य व राज्यांतर्गत सेवा बंद करण्यात आली होती. त्यापैकी राज्यांतर्गत सेवा म्हणजेच आंतरजिल्हा बससेवा २० ऑगस्टपासून सुरू होणार आहे.

गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील लाखो प्रवाशांना या निर्णयामुळे दिलासा मिळेल, अशी माहिती राज्याचे परिवहनमंत्री व एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब यांनी पत्रकार परिषदेत दिली.

श्री. परब म्हणाले, की २० ऑगस्टपासून एसटीच्या साधी, निमआराम, शिवशाही, शिवनेरी या सर्व प्रकारच्या बस सेवा टप्प्याटप्प्याने सुरू होत आहेत. मूळ तिकीट दरातच या सेवा दिल्या जाणार आहेत. लांब आणि मध्यम पल्ल्याच्या बसेस आगाऊ आरक्षणासाठी उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. एसटीच्या प्रवासासाठी ई-पासची आवश्यकता नाही. प्रवासात प्रवाशांनी कोविड-१९च्या प्रतिबंधासाठी आखून दिलेल्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे.

कोविड-१९च्या पार्श्वभूमीवर २३ मार्च २०२०पासून मुंबईतील अत्यावश्यक सेवा वगळता संपूर्ण राज्यातील एसटी सेवा बंद करण्यात आली होती. दरम्यानच्या काळात राज्य शासनाने दिलेल्या निर्देशानुसार एसटीने परप्रांतीय मजुरांची वाहतूक, कोटा येथून महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी सुखरूप पोहचविणे, कोल्हापूर – सांगली येथील ऊसतोड मजुरांना त्यांच्या मूळ गावी सोडणे, अशा प्रकारे समाजातील सर्व घटकांना सुरक्षित दळणवळण सेवा पुरविली आहे.

२२ मेपासून शासनाने दिलेल्या निर्देशानुसार जिल्ह्यांतर्गत बससेवा सुरू करण्यात आली. त्याद्वारे दररोज सुमारे १३०० बसेसमधून सरासरी ७२८७ फेऱ्यांतून अंदाजे दीड लाख प्रवाशांना एसटीने सुरक्षित सेवा पुरविली आहे. २० ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या आंतरजिल्हा बससेवेचा प्रवाशांनी नियमांचे पालन करून लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. परब यांनी या वेळी केले.

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply