रत्नागिरी : जिल्ह्यात आज (ता. १९) करोनाचे ३९ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या ३०५७ झाली आहे.
आज आढळलेल्या रुग्णांचा तपशील असा – आरटीपीसीआर – रत्नागिरी ९, ॲन्टीजेन टेस्ट – रत्नागिरी २२, लांजा ५, खासगी कंपनी ३. जिल्ह्यात आतापर्यंत २३ हजार १६७ नमुने तपासण्यात आले. त्यापैकी २० हजार ९८ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. रत्नागिरीच्या प्रयोगशाळेत आज सलग दुसऱ्या दिवशीही एकाही नमुन्याचा अहवाल प्रलंबित राहिलेला नाही.
आज बरे झालेल्या ८८ जणांना घरी पाठविण्यात आले. त्यामुळे आजपर्यंत बरे झालेल्यांची संख्या १९५३ झाली आहे. आज रत्नागिरीत एका ५० वर्षीय महिलेचा करोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे मृतांची एकूण संख्या १०८ झाली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक ३६ बळी रत्नागिरी तालुक्यातील असून, इतर तालुक्यांचा तपशील असा – खेड १२, गुहागर ४, दापोली २०, चिपळूण १८, संगमेश्वर ८, लांजा २, राजापूर ७, मंडणगड १.
मुंबईसह बाहेरच्या जिल्ह्यातून आल्याने होम क्वारंटाइन असलेल्यांची आजची संख्या ३३ हजार ९५३ एवढी आहे.
रत्नागिरीतील प्रसिद्ध ऑर्थोपेडिक सर्जन डॉ .पांडुरंग कांबळे यांचे निधन
रत्नागिरीतील प्रसिद्ध ऑर्थोपेडिक सर्जन डॉ .पांडुरंग कांबळे यांचे आज (१९ ऑगस्ट) पहाटे निधन झाले. काही दिवसांपूर्वी त्यांना करोनाची लागण झाली होती. त्यानंतर ते करोनामुक्त झाल्याचाही मेसेज त्यांनी सोशल मीडियाद्वारे दिला होता. आज पहाटे अचानक यांचे निधन झाले. रत्नागिरी येथील अतिशय चांगले व गोरगरिबांचे डॉक्टर म्हणून ते प्रसिद्ध होते.
सिंधुदुर्गातील परिस्थिती
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील करोनाबाधितांची एकूण संख्या ६८९वर पोहोचली आहे. त्यापैकी ४६० जणांनी करोनावर मात केली असून, २१५ जणांवर सध्या उपचार सुरू आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील १४ जणांचा करोनामुळे बळी गेला आहे. सध्या जिल्ह्यात ८२ कंटेन्मेंट झोन आहेत.
