रत्नागिरी : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्ताने येथील जनजागृती संघातर्फे घरोघरी तिरंगा मोहिमेसह रत्नागिरीत सायकल फेरी, फोटोग्राफी स्पर्धेसह विविध उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत. संघातर्फे येथील अंबर हॉलमध्ये आयोजित केलेल्या बैठकीत याबाबतची माहिती देण्यात आली. जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी यावेळी मार्गदर्शन केले.
यावेळी व्यासपीठावर जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी सुशांत खांडेकर, तहसीलदार शशिकांत जाधव, रत्नागिरी हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष रमेश कीर, जनजागृती संघाचे अध्यक्ष केशव भट, कौस्तुभ सावंत उपस्थित होते. जिल्हाधिकारी म्हणाले, मला स्वातंत्र्याची जाणीवच नसेल तर मी या भूमीसाठी काही करू शकत नाही. लोकशाही अधिक सुदृढ होण्यासाठी स्वतःची जबाबदारी ओळखली पाहिजे, देशभावना जागृत झाली पाहिजे. संस्कृती, एकीची भावना मनात असली पाहिजे. या सर्व उपक्रमांना शासन हे माध्यम आहे. भारताचे वैभवशाली स्वरूप पुन्हा दिसण्यासाठी युवा पिढीचे योगदान महत्त्वाचे आहे. आपल्या देशाचा अभिमान वाटला पाहिजे, देशाची प्रतिमा चांगली आहे ती तशीच जगासमोर दिसली पाहिजे, असे आपले वर्तन असावे.
यावेळी त्यांनी घरोघरी ध्वज लावण्यासंदर्भातील नियम सांगितले. जिल्हा प्रशासनाने वेबसाइट तयार केली आहे. त्यामध्ये विविध उपक्रमांचे फोटो अपलोड करण्यात येणार आहेत. नमन जाखडीच्या माध्यमातून जिल्ह्याची संस्कृती सर्वदूर पोहोचवण्याचा मानस आहे. सायकल फेरीपूर्वी खड्डे बुजवण्यासाठी सूचना देतो, असे त्यांनी सांगितले. सायकलवरसुद्धा तिरंगा लावता येईल. सायकल फेरीमध्ये सर्व वृत्तपत्रांनीही सहभाग घ्यावा. शासकीय कार्यालये, खासगी कार्यालये, घरे यावरील ध्वजासाठी वेगवेगळ्या सूचना आहेत. प्लास्टिकच्या ध्वजाला बंदी आहे. गाड्यांवरही ध्वज लावता येईल, मात्र त्याचा अवमान होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे.
मारुती मंदिर किंवा अन्य महत्त्वाच्या चौकात पोलीस बँडद्वारे राष्ट्रगीतांचे सादरीकरण करता येईल. जयस्तंभ येथे सेल्फी विथ तिरंगा घेता येईल. त्यासाठी १३ ते १५ ऑगस्ट दरम्यान सेल्फी पॉइन्ट करण्यात येईल. धार्मिकस्थळीसुद्धा घरोघरी तिरंगा या उपक्रमाची माहिती पोहोचवण्याच्या सूचना डॉ. पाटील यांनी दिल्या.
याप्रसंगी केशव भट यांनी सर्व जनतेला ध्वज आचारसंहितेची माहिती मिळावी, अभियान झाल्यानंतर ध्वजाचा अवमान होता कामा नये, असे सांगितले. शहरात सायकल फेरीपूर्वी खड्डे बुजवण्याची व्यवस्था स्थानिक नगरसेवकांनी करावी. अमृत महोत्सव साजरा करताना रस्ते गुळगुळीत व्हायला हवेत, अशी जनतेची अपेक्षा असल्याचे सांगितले. तिरंगा ध्वजासोबत सेल्फी दाखवा आणि जिलेबी किंवा अन्य कोणत्याही वस्तू खरेदीत सवलत मिळवा, अशी योजना व्यापाऱ्यांना आखता येईल, असेही भट यांनी सुचवले.
मिरजोळे ग्रामपंचायतीचे संदीप नाचणकर यांनी गावात ग्रामपंचायतीच्या वतीने ध्वजवितरण करणार असल्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आल्याची माहिती दिली. जिल्हा फोटोग्राफर व तालुका असोसिएशनच्या माध्यमातून हर घर तिरंगा आणि निसर्गचित्रण फोटोग्राफी स्पर्धेचे आयोजन करणार असल्याचे कांचन मालगुंडकर आणि गुरू चौघुले यांनी सांगितले.
रत्नागिरी सायकलिस्ट क्लबचे प्रसाद देवस्थळी यांनी सांगितले की, ७ ऑगस्टला शहरात घरोघरी तिरंगा अभियानाअंतर्गत सायकल फेरी काढण्यात येणार आहे. त्याकरिता जिल्हा प्रशासनाचे बहुमोल सहकार्य, मार्गदर्शन मिळावे. यापूर्वी अशा फेऱ्यांना रत्नागिरीतून उदंड प्रतिसाद मिळाला आहे.
प्रत्येक हॉटेलच्या इमारतीला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येणार आहे. नियमानुसार ध्वज फडकवण्यात येईल, असे अध्यक्ष रमेश कीर यांनी जाहीर केले. ज्या स्वातंत्र्यसेनानींमुळे देश स्वतंत्र झाला त्यांचे स्मरण व लोकजागृतीसाठी हे नक्की करूच. शक्य असेल तर ग्राहकांना सवलतही देण्यात येईल, असे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कौस्तुभ सावंत यांनी केले. केशव भट यांनी स्वागत केले. या सभेला सुमारे दोनशे संस्थांचे प्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.




