रत्नागिरी : येथील स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेने२० जून ते २० जुलै या ठेववृद्धी मासाच्या अखेरच्या दिवशी १ कोटी १६ लाखाच्या ठेवी जमा झाल्या असून पतसंस्थेकडील एकूण ठेवी ३२३ कोटीवर गेल्या आहेत, अशी माहिती पतसंस्थेचे अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी दिली.
पतसंस्था गेली २८ वर्षे ठेववृद्धी मास साजरा करत आली आहे. आज सांगता झालेल्या ठेववृद्धी मासात पतसंस्थेकडे १२५५ ठेव खात्यांच्या माध्यमातून १६ कोटी १५ लाखांच्या ठेवी संकलित झाल्या. नूतनीकरण झालेल्या अथवा पुनर्गुंतवणूक झालेल्या ठेवी ७४ कोटीच्या आहेत.
श्री. पटवर्धन म्हणाले, ठेवीदारांचा हा सातत्यपूर्ण प्रतिसाद सविनय स्वीकारताना मन कृतज्ञतेच्या भावनेने ओतप्रत आहे. प्रचंड स्पर्धा, प्रचंड व्याजदरांची पसरवलेला भुलभुलय्या या कशाचाही विपरीत परिणाम न होता स्वरूपानंद पतसंस्थेवर असलेला विश्वास आणि अर्थकारणापलीकडे जाऊन निर्माण झालेले नाते, स्वरूपानंदाचे अर्थकुटुंब सातत्याने विस्तारित नेत आहे. त्यामुळेच आपलेपणाच्या नात्याने ठेवीदार विश्वासार्हता, सुरक्षितता आणि सदाचारी व्यवहारांचा मानदंड जपणाऱ्या स्वरूपानंद पतसंस्थेकडे मोठ्या विश्वासाने ठेव गुंतवत असतात. त्याचे प्रत्यंतर पुन: पुन्हा येते. ही विश्वासार्हता जपत संस्थेचे अर्थकारण अधिक व्यापक बनवत अग्रेसर करण्याचा अथक प्रयत्न राहील, याची ग्वाही देत ठेववृद्धी मासाच्या या दणदणीत यशाबद्दल आनंद व्यक्त करतो. सर्व ठेवीदारांना मनःपूर्वक धन्यवाद देतानाच नवीन आकर्षक योजना घेऊन लवकरच परत भेटू.
हा प्रतिसाद सुकर व्हावा यासाठी प्रयत्न करणारे स्वरूपानंदचे सर्व अधिकारी, कर्मचारी, पिग्मी प्रतिनिधी या सर्वांचेही अभिनंदन. त्यांच्या टीमवर्कमुळे ‘ग्राहक देवो भव’ या उक्तीचे आचरण प्रत्यक्षात केल्यानेच संस्था जनमानसात अग्रनामांकन घेऊन पुढे जात आहे, अशी भावोत्कट प्रतिक्रिया अध्यक्ष ॲड. पटवर्धन यांनी दिली.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

