बौद्धिक, सामाजिक, मानसिक स्वास्थ्यासाठी वाचन आवश्यक : शेखर निकम

चिपळूण : बौद्धिक, सामाजिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी वाचन अत्यंत आवश्यक असून चरित्र वाचनातून संघर्षमय व्यक्तिमत्त्वांची प्रेरणा मिळते, असे प्रतिपादन चिपळूणचे आमदार शेखर निकम यांनी केले.

चिपळूणमधील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाचनालयाच्या रौप्यमहोत्सवी सांगता समारंभात ते बोलत होते. यावेळी ‘शब्द माझा मृदंगी’ या विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले.

कार्यक्रमास नगराध्यक्ष उमेश सकपाळ, मुख्याधिकारी संजय जाधव, नगरसेवक निहार कोवळे, विकी लवेकर, शशिकांत मोदी, मार्गदर्शक प्रकाश देशपांडे, ‘लोटिस्मा’चे अध्यक्ष डॉ. यतीन जाधव, वाचनालयाचे अध्यक्ष राष्ट्रपाल सावंत, कार्याध्यक्ष सुनील खेडेकर, कार्यवाह सुमेध करमरकर आदी उपस्थित होते.

श्री. निकम म्हणाले, आजच्या काळात वाचनाचे प्रमाण कमी होत असताना एआय तंत्रज्ञानाची गरज शालेय स्तरापासून कितपत आहे, याचा गांभीर्याने विचार होणे आवश्यक आहे. स्व. गोविंदराव निकम यांनी ‘गाव तिथे वाचनालय’ ही संकल्पना राबवली होती. विद्यार्थ्यांनी शालेय जीवनापासून वाचनाची सवय लावून घेतली पाहिजे. बिहारमधील विद्यार्थी स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होतात, कारण त्यांना लहानपणापासून त्यासाठी तयार केले जाते.

नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांनी कै. रमेश चिपळूणकर (गुरुजी) यांच्या माध्यमातून वाचनालयाशी जुळलेला संबंध सांगितला. वाचनालयाला नगरपरिषद आणि वैयक्तिक स्तरावर सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.

धनंजय चितळे यांनी “मुलं वाचत नाहीत, कारण त्यांना वाचणारे आई-वडील दिसत नाहीत,” अशी खंत व्यक्त करत अधिकाधिक नागरिकांनी वाचनालयाचे सदस्य व्हावे, असे आवाहन केले.

विद्यार्थिनी अनन्या खेराडे हिने स्वागतगीत सादर केले. प्रास्ताविकात प्रदीप पवार यांनी रौप्यमहोत्सवी उपक्रमांचा आढावा घेतला. विशेषांकाबाबत संपादक धीरज वाटेकर यांनी माहिती देत ‘वाचनालयांचे भवितव्य’ या विषयावरील संदर्भीय लेखांचा परिचय करून दिला. राष्ट्रपाल सावंत यांनी वाचनालयाच्या उभारणीचा प्रवास मांडला, तर डॉ. यतीन जाधव यांनी मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाची सुरुवात नगराध्यक्ष सकपाळ यांच्या हस्ते ग्रंथप्रदर्शन उद्घाटन व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमापूजनाने झाली. सूत्रसंचालन अमित ओक यांनी केले, तर आभार प्राची जोशी यांनी मानले.

यातील उपस्थित कवींचा मान्यवरांच्या हस्ते रोख रक्कम, बांधावरच्या ‘अभिनव’ साहित्य संमेलनाचे प्रतीक असलेली घोंगडी, संमेलन बॅग, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र, ग्रंथभेट देऊन गौरव करण्यात आला. प्रथम विजेते देशपांडे यांच्या अभिप्रायाचे वाचन प्रा. अंजली बर्वे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धीरज वाटेकर यांनी केले. ‘गणपत वाणी’ ही कविता बा. सी. मर्ढेकर यांच्या १९५१च्या ‘आणखी काही कविता’मधील आहे. मर्ढेकर हे विसाव्या शतकातील कवी केशवसुत यांच्यानंतरचे युगप्रवर्तक कवी होते. युद्धोत्तर काळातील नव्या जाणिवा आणि नव्या युगाची जाणीव व्यक्त करणाऱ्या त्यांच्या कविता होत्या. अवघ्या ४७ वर्षांचे (१९०९-१९५६) आयुष्य लाभलेल्या मर्ढेकर यांनी गणपत वाण्याच्या मनात चाललेल्या स्वप्नरंजनात वाचकालाही सहभागी करून घेणाऱ्या अजरामर कवितेसह एकूण १२६ कविता लिहिल्याची माहिती धीरज वाटेकर यांनी सूत्रसंचालनातून दिली. स्वत:च्या श्रेष्ठ वाङ्मयीन दर्जाची जाण असल्यानेच मर्ढेकर यांच्या कवितांना टीपा, तळटीपा, शीर्षक नसल्याचे त्यांनी नमूद केले.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply