रत्नागिरी : पुरामुळे देवळात छपरापर्यंत पाणी भरले, तरीही तोणदे (ता. जि. रत्नागिरी) येथील ग्रामस्थांनी श्रावणातील नामसप्ताहात खंड पडू दिला नाही.
जिल्ह्यातील शंकराच्या मंदिरांमध्ये श्रावण महिन्यात अखंड हरिनाम सप्ताह साजरा केला जातो. तोणदे (ता. रत्नागिरी) येथेही सांब मंदिरात गेल्या सोमवारी अखंड हरिनाम सप्ताह सुरू झाला. गेले दोन दिवस पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे सांब मंदिरात पाणी भरले. पाणी अगदी देवळाच्या छतापर्यंत पोहोचले. सांब म्हणजे आपला तारणहार आहे या श्रद्धेने, ग्रामस्थांनी पुराचे विघ्न आले तरी नामगजर सुरूच ठेवला. कोकणवासीयांच्या भक्तीचे हे आगळे दर्शन आहे.

