रत्नागिरी : आज (ता. २०) सायंकाळच्या अहवालानुसार गेल्या २४ तासांत करोनामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील पाच जणांचा मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यातील करोनामुळे मरण पावलेल्यांची संख्या ११२ झाली असून, त्यापैकी सर्वाधिक ३८ जण रत्नागिरी तालुक्यातील आहेत.
काल रात्री चिपळूण येथील पुरुष (वय ७५), रत्नागिरीतील पुरुष (वय ४९) आणि जिल्ह्याबाहेरील ६५ वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला. आज चिपळूण येथील ८४ वर्षे वयाच्या आणि रत्नागिरीतील ८३ वर्षे वयाच्या करोनाबाधिताचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या ११२ झाली आहे. त्यांची तालुकानिहाय आकडेवारी अशी – रत्नागिरी ३८, खेड १२, गुहागर ४, दापोली २०, चिपळूण २०, संगमेश्वर ८, लांजा २, राजापूर ७, मंडणगड १.
दरम्यान, आज जिल्ह्यात नवे ७३ बाधित रुग्ण आढळले. त्यांचा तपशील असा – आरटीपीसीआर – रत्नागिरी २२, ॲन्टीजेन टेस्ट – रत्नागिरी ४, लांजा ९, कामथे ३२, संगमेश्वर २, लोटे ४. या ७३ जणांमुळे जिल्ह्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या आता ३१३० झाली आहे.
आज ३६ जणांना बरे वाटल्याने घरी पाठविण्यात आले. त्यांचे विवरण असे – कोव्हिड केअर सेंटर, समाजकल्याण भवन, रत्नागिरी २, कोव्हिड केअर सेंटर, घरडा २, कोव्हिड केअर सेंटर, पेढांबे ३२. आजपर्यंत बरे झालेल्यांची संख्या १९८९ झाली आहे. आता विविध रुग्णालयांमध्ये १०२९ ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्ण उपचारांखाली आहेत. आणखी ९८९ जण संस्थात्मक विलगीकरणात दाखल आहेत, तर होम क्वारंटाइनमध्ये ३० हजार ७३७ जण आहेत.
