रत्नागिरी : मराठी कवी व लेखकांच्या उत्कर्षासाठी तळमळीने कार्य करणाऱ्या मराठी कवी व लेखक संघटनेची रत्नागिरी जिल्ह्याची नूतन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. राजापूर तालुक्यातील सौंदळ गावचे रत्नसिंधू कलामंच महाराष्ट्र या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सुनील जाधव यांची संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाली आहे.
राजापूर तालुक्यातील ओणीतील नूतन विद्यामंदिर व कनिष्ठ महाविद्यालयात सहायक शिक्षक म्हणून, तसेच सामाजिक संस्थेवरही पदाधिकारी म्हणून ते कार्यरत आहेत. सुनील सुरेखा या नावाने ते कवितालेखन करतात. संघटनेच्या उपाध्यक्षपदी मनोज जाधव (संगमेश्वर), सचिवपदी संदेश सावंत (सावर्डे), सहसचिवपदी रूपाली पाटील (खेड), कोषाध्यक्षपदी संजय तांबे (रत्नागिरी), सहकोषाध्यक्षपदी दिलीप चव्हाण (लांजा), संघटकपदी राजेश इंगळे, तर सल्लागारपदी राष्ट्रपाल सावंत (चिपळूण) या मंडळींची निवड झाली आहे. निवड झालेल्या नवनिर्वाचित कार्यकारिणीचे अभिनंदन करण्यात आले आहे.

