रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी उपलब्ध करून देण्याची मागणी

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी उपलब्ध करून देण्याची मागणी भाजपा दक्षिण विभागाचे जिल्हाध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमतरता असून, डॉक्टरअभावी ग्रामीण भागातून येणाऱ्या गोरगरीब रुग्णांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या विषयात गांभीर्याने लक्ष घालून पुरेशा संख्येने डॉक्टर उपलब्ध करून देण्यात यावेत, असे श्री. पटवर्धन यांनी निवेदनात म्हटले आहे.

रत्नागिरी जिल्हा रुग्णालयामध्ये मोठ्या प्रमाणावर रुग्ण सातत्याने येत असतात. दररोज २५० ते ३०० रुग्ण ओपीडी विभागात येतात. ॲडमिट रुग्णांची संख्या १५० च्या पुढे सातत्याने असते. गेली काही वर्षे डॉक्टरअभावी रुग्णांना खूप त्रास सहन करावा लागत आहे. डॉक्टरांची संख्या खूपच कमी आहे. अनेक जागा रिक्त आहेत. परिणामी रुग्ण सेवेवर विपरीत परिणाम होत आहे. आज रुग्णालयात एकही प्रसूती तज्ज्ञ डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे खूप दारुण अवस्था निर्माण झाली आहे. अशा स्थितीत रुग्णांना कोल्हापूर, डेरवण, चिपळूण या रुग्णालयात जाण्याचा सल्ला अनिवार्यपणे देण्यात येतो. ही परिस्थिती खूप गंभीर आहे. रुग्णांच्या जीवाशी होणारा हा खेळ थांबवला पाहिजे. या विषयात गांभीर्याने लक्ष घालून पुरेशा संख्येने डॉक्टर या रुग्णालयात तातडीने रुजू व्हावेत म्हणून योग्य निर्देश संबंधित विभागाला देऊन अतितत्पर पद्धतीने डॉक्टर रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात उपलब्ध करून देण्यात यावेत, असे श्री. पटवर्धन यांनी निवेदनात नमूद केले आहे.

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply