Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

सावरकरांनी सुरू केलेला सहभोजनाचा कार्यक्रम पतितपावन मंदिरात पुन्हा सुरू होणार

Advertisements

रत्नागिरी : दानशूर श्रीमान भागोजीशेठ कीर आणि स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांनी २४ फेब्रुवारी १९३१ रोजी पतितपावन मंदिराच्या कलशारोहणाच्या वेळी सुरू केलेला ऐतिहासिक सहभोजनाचा कार्यक्रम यंदापासून पुन्हा सुरू करण्यात येणार आहे.

अखिल भारतीय भंडारी समाज महासंघ आणि रत्नागिरी तालुका भंडारी समाज, पतितपावन मंदिर संस्थेने याकरिता नियोजन केले आहे. मंदिराचा कलशारोहण वर्धापनदिन आणि भागोजीशेठ यांची पुण्यतिथी याचे औचित्य साधून येत्या २४ फेब्रुवारीला तीन हजार लोक सहभोजनात सहभागी होतील, अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली.

ब्रिटिशांनी वीर सावरकरांना ५० वर्षे काळ्या पाण्याची शिक्षा सुनावली. परंतु काही वर्षांनी त्यांची सुटका करून रत्नागिरीत स्थानबद्धतेत ठेवले. या काळात राजकीय कार्यात भाग घ्यायचा नाही, अशी त्यांना अट घातली. परंतु वीर सावरकरांनी तेव्हाच्या समाजव्यवस्थेतील त्रुटींवर भाष्य करत या त्रुटी दूर करण्याचा प्रयत्न केला. त्यात त्यांना यश आले. रत्नागिरीत वीर सावरकरांनी रत्नागिरीच्या वास्तव्यात स्पर्शबंदी, व्यवसायबंदी, मंदिर प्रवेशबंदी, रोटीबंदी व वेदोक्तबंदी या सर्व बंदी उठवून हिंदू धर्मसुधारणा केली. हिंदू संघटन, अस्पृश्यता निवारण, भाषा शुद्धीकरण, स्वदेशीचा पुरस्कार केला. वीर सावरकरांचे अनुयायी कै. डॉ. महादेव शिंदे यांनी या कार्यात महत्त्वाची भूमिका बजावण्यासाठी भागोजीशेठ कीर यांची भेट घालून दिली. त्यानंतर अस्पृश्यांना मंदिर प्रवेशासाठी भागोजीशेठ यांनी स्वतः जागा खरेदी करून पतितपावन मंदिराची उभारणी केली. त्याच मंदिराच्या कलशारोहणावेळी सहभोजन व सहभजन चालू केले.

मंदिराच्या आवारातील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकामध्ये पत्रकार परिषेदत राजीव कीर यांनी दानशूर भागोजीशेठ कीर यांच्या कार्याचा आढावा घेतला. ते म्हणाले की, भागोजीशेठ यांचे २४ फेब्रुवारी १९४४ रोजी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर सहभोजनाचा कार्यक्रम बंद पडला होता. तो १९८७ आणि २००८ साली झाला. आता सर्व समाजाला पुन्हा एकत्रित आणण्याकरिता भंडारी समाज व पतितपावन मंदिर संस्थेने पुढाकार घेतला आहे. त्यामुळे यंदा मोठ्या प्रमाणात हा कार्यक्रम होईल व प्रतिवर्षी कार्यक्रम करणार आहोत, असे राजीव कीर यांनी सांगितले.

भागोजीशेठ कीर यांच्या पुण्यतिथीनिमित्त २४ ला सकाळी ९ ते ११.३० या वेळेत शहरातून वाहन फेरी काढण्यात येईल. फेरीची सांगता पतितपावन मंदिरात होईल. त्यानंतर सभा होईल. दुपारी १२.३० ते ३ या वेळेत सहभोजन कार्यक्रम होईल. मंदिराच्या समोरील भागात मंडपाची व्यवस्था करण्यात येणार आहे. वीर सावरकरांवर लिखाण करणाऱ्या व्यक्ती, कलाकारांचा प्रातिनिधिक सन्मान या वेळी करण्यात येणार आहे.

यंदाच्या कार्यक्रमाची सर्व धुरा भंडारी समाजाने आपल्या खांद्यावर घेतली आहे. समाजातूनही मदत मिळणार आहे. पुढील वर्षापासून सर्व समाजाच्या सहयोगातून हा कार्यक्रम सुरू ठेवण्याचा निर्धार करण्यात आला आहे.

पत्रकार परिषदेला नाभिक समाजाचे श्रीकृष्ण तथा बावा चव्हाण, तेली समाजाचे दीपक राउत, कुंभार समाजाचे प्रकाश ऊर्फ बावाशेठ साळवी, त्वष्टा कासार समाजाचे अनिल पोटफोडे, पतितपावन मंदिर संस्थेचे अध्यक्ष उन्मेष शिंदे, वैश्य समाजाचे राजन मलुष्टे, भंडारी समाजाचे अध्यक्ष रूपेंद्र शिवलकर, कुमार शेट्ये, कांचन मालगुंडकर, कटबु समाजाचे बी. टी. मोरे, तेली समाजाचे जिल्हाध्यक्ष रघुवीर शेलार आदी उपस्थित होते.

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version