

रत्नागिरी : स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांना रत्नागिरीकरांनी आज अभिवादन केले. स्वातंत्र्यलक्ष्मी चौकातील वीर सावरकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला. तसेच ऐतिहासिक पतितपावन मंदिरात प्रतिमेला अभिवादन केले. विशेष कारागृहात स्वा. सावरकर स्मारकाला भेट देऊन तिथे पतितपावन मंदिराचे कार्यकर्ते नतमस्तक झाले.
वीर सावरकर यांना रत्नागिरीमध्ये १९३१ मध्ये ब्रिटिशांनी बंदी म्हणून आणून ठेवले. सावरकरांनी या वास्तव्यात रत्नागिरीमध्ये हिंदु धर्मातील अनिष्ट प्रथांविरोधात चळवळ उभी केली. तसेच समाजातील सर्वांना मंदिरात प्रवेश देण्यासाठी भागोजीशेठ कीर यांना स्वतंत्र मंदिर उभारण्याची विनंती केली. भाषाशुद्धी चळवळ उभारली. रत्नागिरीतील वास्तव्यात त्यांनी नाटके लिहिली. हिंदु धर्माला नवचेतना देण्याचे कार्य सावरकरांनी रत्नागिरीत केले.
आज सावरकरांच्या या कार्यकर्तृत्वाला उजाळा मिळाला. पतितपावन मंदिर संस्थेच्या वतीने वीर सावरकरांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. विशेष कारागृहात वीर सावरकर स्मारकाचे रूपडे गेल्या तीन-चार वर्षांत पालटले आहे. या स्मारकात ठेवलेल्या वीर सावरकरांच्या तैलाकृती प्रतिमेला अभिवादन केले. याप्रसंगी ज्येष्ठ विधिज्ञ बाबासाहेब परुळेकर, राजू जोशी, नितीन गुरव, उमेश खंडकर, मोहन दामले, मंदार खेडेकर, वैभव वाडेकर, तुषार खंडेकर, मंदार खंडकर, अथर्व कोकजे, अशोक थत्ते, रोहित रेडीज आदी उपस्थित होते.
Follow Kokan Media on Social Media Follow Kokan Media on Social Media