अंतिम फेरी – रत्नागिरी केंद्र
नाटक दि. ५ फेब्रुवारी २०२३, सायंकाळी ७.०० वाजता
रत्नागिरी : एकसष्टाव्या राज्य संगीत नाट्य स्पर्धेत ५ फेब्रुवारी २०२३ रोजी सायंकाळी ७.०० वाजता संगीत संशयकल्लोळ हे नाटक गोव्याच्या संस्थेने सादर केले.
सादर करणारी संस्था :
सुयोग कला मंच, गोवा
संगीत संशयकल्लोळ हे गोविंद बल्लाळ देवल यांनी लिहिलेले एक विनोदी नाटक आहे. या नाटकाचा पहिला गद्य प्रयोग १८९४ साली तसबिरीचा घोटाळा ऊर्फ फाल्गुनरावाचा फार्स या नावाने झाला. १९१६ पर्यंत या गद्य नाटकाचे सतत प्रयोग होत होते. गंधर्व नाटक कंपनीने मूळ नाट्यसंहितेत थोडाफार बदल करून नाटकात ३० पदे घातली. ही बहुतेक सर्व गाणी देवलांनी रचली होती. देवल हे अण्णासाहेब किर्लोस्करांचे शिष्य होते आणि एक उत्कृष्ट तालीममास्तर, कवी आणि संगीताचे जाणकार होते.
अश्विनशेठ आणि रेवती हे या नाटकाचे नायक-नायिका आहेत. फाल्गुनराव आणि कृत्तिका या भूमिका थोडीफार खलनायकी स्वरूपाच्या आहेत. नायक-नायिकेत गैरसमज करून देण्यामागे त्यांचा सहभाग आहे. याशिवाय अश्विनशेठचा मित्र वैशाखशेठ, रेवतीची आई मघा नायकीण, तसेच भादव्या, रोहिणी, आषाढ्या, स्वाती, तारका आदी दुय्यम पात्रेही नाटकात कथानकाच्या संदर्भात महत्त्वाची भूमिका बजावताना दिसतात. त्यामुळे नाटकाच्या रंजकतेमध्ये अधिक भर पडली आहे.
फाल्गुनराव हा संशयी स्वभावाचा आहे. तो आपली बायको कृत्तिकावर संशय घेतो. तीही संशयग्रस्त आहे. या संशयाच्या जाळ्यात ते नकळत अश्विनशेठ-रेवती या नायक-नायिकेलाही ओढतात. ही गुंतागुंत शेवटी सर्व संशय फिटेपर्यंत वाढतच जाते आणि नाटक, बघणाऱ्याची उत्सुकता ताणत ताणत अखेरपर्यंत मनोरंजक राहते.
लेखक : गोविंद बल्लाळ देवल
दिग्दर्शक : शेखर उसगावकर
संशयकल्लोळ नाटकातील काही क्षणचित्रे




