रत्नागिरी : भारताची चांद्रयान – ३ मोहीम यशस्वी झाल्याचा आनंद व्यक्त करून इस्रोच्या शास्त्रज्ञांच्या कार्यकर्तृत्वाला सलाम करण्यासाठी येथील स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेने “विक्रम ठेव योजना” जाहीर केली आहे.
चांद्रयानाचा उपक्रम यशस्वी झाला. सर्व भारतीयांसाठी अभिमानाचा, आनंदाचा हा क्षण देशवासीयांनी अनुभवला. शास्त्रज्ञांनी केलेली ही कमाल भारताला आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगळी उंची देणारी आहे. येथील स्वामी स्वरूपानंद पतसंस्था या यशदायी क्षणामध्ये सगळ्यांना सहभागी करून घेऊन हा प्रसंग अविस्मरणीय करू इच्छिते. त्यासाठी आजपासून ३० ऑगस्टपर्यंतच्या कालावधीसाठी विक्रम ठेव योजना ही एक विशेष ठेव योजना घोषित करण्यात आली आहे.
ही योजना १३ महिने कालावधीसाठी असून ९ टक्के व्याजदर असेल. किमान १ लाख रुपये गुंतवणूक करावी लागेल, अशी ही विक्रम ठेव योजना घोषित करताना खूप आनंद होत असल्याचे अध्यक्ष ॲड.दीपक पटवर्धन यांनी सांगितले. केवळ ६ दिवस ही योजना सुरू असेल. गुंतवणूकदारांनी विक्रम ठेव योजनेत विक्रमी गुंतवणूक करून आकर्षक व्याजदराचा लाभ घ्यावा आणि यशस्वी चांद्रयान मोहिमनेच्या स्मृती सदैव जागृत ठेवाव्यात, असे आवाहन त्यांनी केले आहे.
विक्रम योजनेच्या पार्श्वभूमीवर संस्थेच्या १७ शाखांच्या परिसरात असणाऱ्या १७ विद्यालयांना प्रयोगशाळेसाठी साहित्य प्रदान करण्याचा उपक्रम येत्या ३१ ऑगस्ट रोजी राबवण्यात येणार आहे. प्रयोगशीलता जोपासण्याचा संस्कार अधिक प्रबळ करण्यासाठी स्वामी स्वरूपानंद पतसंस्था हा उपक्रम राबवणार आहे, असेही श्री. पटवर्धन यांनी सांगितले.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

