रत्नागिरी : पतसंस्थांच्या ठेवींना विमासदृश संरक्षण प्राप्त होण्यासाठी महाराष्ट्र शासनाने स्थैर्य आणि तरलता निधीमध्ये २०० कोटींचे योगदान करावे, अशी मागणी महाराष्ट्र पतसंस्था फेडरेशन कार्याध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी केली आहे.
श्री. पटवर्धन यांनी याबाबत प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटले आहे की, महाराष्ट्रातील सहकारी पतसंस्थांकडे ७२,६८५ कोटी रुपयांच्या ठेवी असून २ कोटी ६७ लाख ८५ हजार ठेवीदार आहेत, असे गृहीत आहे. राज्यात १३ हजार ४१२ पतसंस्था असल्याचा प्राथमिक आकडा आहे. ज्या व्यवस्थेत २ कोटीपेक्षा जास्त नागरिक ठेवीदार आहेत, त्या व्यवस्थेवर जनसामान्यांचा विश्वास आहे. अशा व्यवस्थेला संरक्षणाचे शासकीय कोंदण मिळण्याच्या दृष्टीने सहकार कायद्यात १४४-२५ अ नुसार स्थैर्य आणि तरलता निधी स्थापन करण्याच्या तरतुदीचा उपयोग सहकार खात्याने जरूर करावा. पतसंस्था अंशदान देण्यास राजी होतील. पण या व्यवस्थेचे नियंत्रण शासकीय यंत्रणेकडे राहणार असल्याने राज्य शासनाने या स्थैर्य निधीमध्ये किमान २०० कोटींची गुंतवणूक करावी, असे श्री. पटवर्धन यांनी म्हटले आहे.
शासनाने राज्यातील २ कोटींपेक्षा अधिक नागरिकांनी केलेल्या गुंतवणुकीचा विचार करून, निर्माण होणाऱ्या अडचणींचा विचार करून स्थैर्य आणि तरलता निधीमध्ये प्रारंभी २०० कोटींची गुंतवणूक केली तर या व्यवस्थेला प्रभावी ताकद प्राप्त होईल. शासनाने गुंतवणूक केल्यास या व्यवस्थेवरचा पतसंस्थांचा विश्वास वाढेल आणि पतसंस्थाही आपल्या हिश्श्याचे अंशदान भरणा करतील. स्थैर्य आणि तरलता निधी समृद्ध करणे, पतसंस्थांचे परीक्षण करणारी स्वतंत्र यंत्रणा उभी करणे या गोष्टी साध्य झाल्यास ठेव संरक्षित करण्याचा मार्ग प्रशस्त होईल. विद्यमान यंत्रणा अत्यंत तोकडी असल्याने पतसंस्थांच्या आर्थिक व्यवहारांचे नियंत्रण आणि नियमन करणे अवघड होते. त्यामुळे अडचणीत येणाऱ्या पतसंस्थांची माहिती खूप उशिरा प्राप्त होते. हे टाळण्यासाठी नियंत्रणासाठी सजग नवी यंत्रणा आणि समृद्ध स्थैर्य निधी शासनाच्या सहभागातून निर्माण केला तर पतसंस्थांच्या ठेवींना संरक्षण देणारी यंत्रणा कार्यान्वित होऊ शकेल. पतसंस्थांच्या ठेवींना विमासदृश संरक्षण मिळाले तर पतसंस्था चळवळीतील गुंतवणूक अधिक वाढेल आणि पतसंस्थांचे कामकाज अधिक उपयुक्त पद्धतीने अग्रेसर होईल.
स्थैर्य आणि तरलता निधीसाठी शासनाने २०० कोटीची गुंतवणूक करून स्थैर्यनिधीचे कामकाज सुरू करून एक नवा अध्याय सहकारी पतसंस्थांच्या जगतात सुरू करावा, असे श्री. पटवर्धन यांनी म्हटले आहे.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

