लांजा : राजापूर-लांजा तालुका नागरिक संघ (मुंबई) आणि शिपोशी ग्रुप ग्रामपंचायत (ता. लांजा) यांच्या संयुक्त विद्यमाने होणार असलेल्या नवव्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाकरिता शिपोशी गाव सज्ज झाले आहे.
न्या. वैजनाथ विष्णु आठल्ये विद्यामंदिराच्या परिसरात रियासतकार गो. स. सरदेसाई साहित्य नगरीमध्ये हे संमेलन होत आहे. संमेलनाचे उद्घाटन शनिवारी (दि. २ मार्च) होणार असले, तरी त्याच्या पूर्वसंध्येला आज विविध कार्यक्रम पार पडले. शिपोशी आणि परिसरातील रांगोळीकारांची रंगावली स्पर्धा झाली. रणरागिणी राणी लक्ष्मीबाई क्रांतीज्योतीची ग्राम मंदिर प्रदक्षिणा पार पडली. सायंकाळी काजळी नदीकिनारी नदीचे जलपूजन झाले. प्रमुख अतिथी – संत तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज हभप अमोल अशोक महाराज मोरे, जिल्हा परिषदेच्या ग्रमीण पाणी पुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंता श्रीमती मयुरी अ. पाटील, अशासकीय जिल्हा समिती सदस्या (नदीप्रहरी) अनिल ज. कांबळे यांच्या उपस्थितीत नदीपूजन झाले. रात्री शाहीर प्रसाद खांदारे यांचा तसेच बोरिवले ग्रामस्थांचा कराओके गाण्यांचा कार्यक्रम पार पडला. रात्री नृत्य झालेल्या स्पर्धेत शिपोशी आणि परिसरातील मुले सहभागी झाली. त्यानंतर शिपोशी हितवर्धक मंडळातर्फे शाहीर रमेश कांबळे आणि पार्टीचा कार्यक्रम पार पडला.
शनिवारी (दि. २ मार्च) सकाळी ८ वाजता गावातील वाकडा फणस ते साहित्य संमेलन नगरीदरम्यान ग्रंथदिंडी काढली जाणार आहे. त्यानंतर सकाळी १० वाजता संमेलनाचे आणि विविध कक्षांचे उद्घाटन होईल. पुस्तक प्रदर्शन व विक्री कक्ष, सुनील कदम यांचे शस्त्र प्रदर्शन, विनायक महाबळ यांचे मोडी पुस्तक प्रदर्शन, कौस्तुभ सुतार संचलित मुलांचे चित्र प्रदर्शन, विजयराज बोधनकर यांचे चित्र प्रदर्शन, प्रगत शेतकऱ्यांच्या झोपडीची प्रतिकृती, स्थानिकांच्या रांगोळी प्रदर्शन यांचा समावेश आहे. त्यानंतर संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार, संपादक विजय कुवळेकर यांच्या अध्यक्षतेखाली संमेलनाचे उद्घाटन होईल. पितांबरी उद्योग समूहाचे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र प्रभुदेसाई उद्घाटन करतील. यावेळी माजी संमेलनाध्यक्ष प्रकाश देशपांडे, मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तिकिरण पुजार, सिने-नाट्य दिग्दर्शक, राजेश देशपांडे, लेखक अशोक लोटणकर, दत्ता पवार, अॅड. विलास कुवळेकर उपस्थित राहतील. शिपोशीचे सरपंच हरेश जाधव संमेलनाचे स्वागताध्यक्ष आहेत. संघाचे सरचिटणीस प्रमोद पवार प्रास्ताविक करतील.
उद्घाटनानंतर दुपारी २ वाजता अपूर्वा सामंत, स्वरा साळवी, आर्या यादव, वृंदा कोतापकर, आरोही फडतरे यांच्या नियोजनाखाली युवा व्यासपीठाचा कार्यक्रम होईल. सायंकाळी साडेतीन वाजता परिणाम (लेखक, कवी, चित्रकार विजयराज बोधनकर), छत्रपती संभाजी महाराज इतिहास (श्रीनिवास पेंडसे), कथा कशी सादर करावी (लेखिका, कथाकथनकार वृंदा कांबळी), जैवविविधता (पर्यावरण अभ्यासक प्रतीक मोरे) या विषयावरील व्याख्याने होतील.
सायंकाळी साडेसहा वाजता समीर देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलन होईल. त्यात अमोल रेडीज, विराज चव्हाण, प्रिया मांडवकर, विजय हटकर, नागेश साळवी, दिलीप चव्हाण, वीणा चव्हाण, रामचंद्र तुळसणकर, स्नेहल तुळसणकर, आकांक्षा भुर्के, अशोक कांबळे, विपुल आढाव, चंद्रसेन जाधव, दीपेश बारस्कर, श्वेता जाधव, आकांक्षा जाधव, जनार्दन मोहिते, स्नेहा रसाळ, नितीश खानविलकर, आकाश परब, संकेत घाग आणि सुभाष लाड हे कवी सहभागी होतील. रात्री साडेआठ वाजता संजय गुरव, उमेश जाधव, बंडू अंधेरे आणि विजय बेंद्रे या निमंत्रितांचे कविसंमेलन होईल. त्यानंतर कोकणचा साज, संगमेश्वरी बाज हा मनोरंजनपर कार्यक्रम होईल.
रविवारी (दि. ३ मार्च) सकाळी साडेआठ वाजता पुरस्कार वितरण समारंभ होईल. त्यादरम्यान मुलांचे निवडक नृत्य सादरीकरण शाहीर मधुकर खामकर आणि मंडळीचा कार्यक्रम होईल. समारंभाचे अध्यक्षस्थान संघाचे अध्यक्ष सुभाष लाड भूषवितील. सामाजिक कार्यकर्ते अजित यशवंतराव सामाजिक कार्यकर्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करतील. यावेळी आमदार राजन साळवी, खासदार विनायक राऊत, उद्योजक आर. डी. सामंत, उद्योजिका उल्का विश्वासराव, अजय आठल्ये, कोर्ले गावचे सरपंच गणेश साळुंके, तळवडे गावच्या सरपंच गायत्री अ. साळवी, कोचरीच्या सरपंच सौ. आकांक्षा आ. गुरव, रिंगणे सरपंच संजय चं. आयरे, सालपे सरपंच सौ. पूजा कांबळे, पालू सरपंच सागर गाडे, वाटूळ सरपंच श्रीमती नीता न. चव्हाण, गोविळ सरपंच संतोष गुरव, कुरचुंब सरपंच प्रसाद माने, मुख्याध्यापक दीपक हनुमंत गमरे, संस्थेचे सरचिटणीस अशोक आठल्ये, सामाजिक कार्यकर्ते सुरेश विष्णु घाग, पांडुरंग खांदारे, पांडुरंग पाटील, उद्योजक प्रसाद पाटोळे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड




