Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

रत्नागिरी, सिंधुदुर्गात प्रत्येकी दोघांचा करोनामुळे मृत्यू

Photo by Markus Spiske on Pexels.com

Advertisements

रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (सोमवारी) करोनाचे नवे ६ रुग्ण आढळले, तर १४ जण करोनामुक्त झाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात नवा १ रुग्ण आढळला, तर एकही रुग्ण करोनामुक्त होऊन घरी जाऊ शकला नाही. दोन्ही जिल्ह्यात प्रत्येकी दोघांचा करोनामुळे मृत्यू झाला.

रत्नागिरीतील परिस्थिती
रत्नागिरी जिल्ह्यात आज १४ जण करोनामुक्त झाल्याने करोनामुक्तांची संख्या आठ हजार ८६५ झाली आहे. करोनामुक्तीचा हा दर ९४.९४ टक्के आहे.

जिल्ह्यात आज आरटीपीसीआर चाचणीनुसार चिपळूणमध्ये ५, तर रॅपिड अँटिजेन चाचणीनुसार लांजा येथे १ बाधित रुग्ण आढळला. (दोन्ही मिळून ६). एकूण रुग्णांची संख्या आता नऊ हजार ३३७ झाली आहे. आज आणखी १२८ जणांच्या स्वॅबची चाचणी घेण्यात आली. मात्र त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला. आतापर्यंत ६१ हजार ६९८ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांत संगमेश्वर तालुक्यात मरण पावलेल्या दोघांच्या मृत्यूची नोंद आज झाली. गेल्या ८ जानेवारीला ५७ वर्षीय महिलेचा, तर ९ जानेवारीला ६८ वर्षीय पुरुषाचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतांची एकूण संख्या ३३६ झाली असून मृत्युदर ३.५९ टक्के झाला आहे.

सिंधुदुर्गात आज दुपारी १२ वाजेपर्यंत आलेल्या अहवालानुसार आज एकही रुग्ण करोनामुक्त झाला नाही. आतापर्यंत करोनावर मात केलेल्यांची एकूण संख्या ५ हजार ५८९ एवढीच राहिली आहे. सध्या जिल्ह्यात २२५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात आज फक्त एकाच अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या आता ५ हजार ९८३ एवढी झाली आहे. करोनामुळे आज दोघांचा मृत्यू झाला. कुडाळच्या वरच्या कुंभारवाडीतील ६८ वर्षीय पुरुष आणि सावंतवाडीतील ७६ वर्षीय पुरुषाचा मृत्यू आज नोंदविला गेला. त्यामुळे आतापर्यंत मृत्यू झालेल्यांची एकूण संख्या १६३ झाल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिली.

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version