दापोली : शिमगोत्सवात लाकडे आणि कचरा जाळण्याचीच प्रथा असताना आवाशी (ता. दापोली) गावाने कचरामुक्तीचा संकल्प करून अनुकरणाचा आदर्श निर्माण केला आहे.
आवाशी गावातील मुंबईस्थित ग्रामस्थ अजय शेडगे यांच्या पुढाकाराने शिमगोत्सवात कचरामुक्त गाव संकल्पनेचा शुभारंभ करण्यात आला. हनुमान मंदिरात प्लास्टिक आणि ओल्या कचऱ्याचे नियोजन कसे करायचे, याविषयी माहिती देण्याकरिता पर्यावरणप्रेमी प्रशांत परांजपे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी प्लास्टिकच्या विळख्यातले पाणी या विषयाअंतर्गत पॉवर पॉइंटच्या माध्यमातून त्यांनी सादरीकरण केले. गाव कचरामुक्त आणि जलयुक्त कसे करायचे, याबाबत आणि विषमुक्त शेती करून एका आदर्श गावाची निर्मिती कशी निर्माण करता येईल, याबाबत श्री. परांजपे यांनी सविस्तर विवेचन केले. शिमगोत्सवानिमित्ताने सामाजिक प्रबोधन करणारे आवाशी हे महाराष्ट्रातील पहिले गाव ठरले असून सर्वांनी या गावाचे अनुकरण करणे आवश्यक असल्याचे मत श्री. परांजपे यांनी व्यक्त केले.
यावेळी रत्नग्रीन टेक्नो सर्व्हिसेसचे मनीष आपटे यांनी घरच्या घरी खत निर्मितीच्या पोर्टेबल युनिटची प्रात्यक्षिकाद्वारे माहिती दिली. गावाच्या कचरामुक्तीच्या संकल्पाला त्यामुळे बळ मिळणार आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

