Site icon साप्ताहिक कोकण मीडिया

रत्नागिरीच्या पाच पट रुग्ण सिंधुदुर्गात करोनामुक्त

Photo by Markus Spiske on Pexels.com

Advertisements

रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (१६ फेब्रुवारी) करोनाचे नवे ८, तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात ६ रुग्ण आढळले. रत्नागिरीत ७, तर सिंधुदुर्गात त्याच्या पाच पट म्हणजे ३५ जण करोनामुक्त झाले. रत्नागिरी जिल्ह्यात एकाच्या मृत्यूची नोंद झाली.

रत्नागिरीतील परिस्थिती

रत्नागिरी जिल्ह्यात आज करोनाचे नवे ८ रुग्ण आढळले. आरटीपीसीआर चाचणीनुसार रत्नागिरीत ५ बाधित आढळले, तर रॅपिड अँटिजेन चाचणीनुसार रत्नागिरी, संगमेश्वर आणि लांजा तालु्क्यात प्रत्येकी १ बाधित रुग्ण आढळले. (दोन्ही मिळून ८). जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण रुग्णांची संख्या आता ९७४१ झाली आहे. आज स्वॅबची चाचणी घेण्यात आलेल्या आणखी २०० जणांचा अहवाल निगेटिव्ह आला. आतापर्यंत ७५ हजार ३९२ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ८३ आहे. त्यातील सर्वाधिक २८ रुग्ण खेड तालुक्यातील कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल आहेत. २७ रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. जिल्ह्यात आज ७ जण करोनामुक्त झाल्याने करोनामुक्तांची एकूण संख्या ९२८३ झाली आहे. करोनामुक्तीचा दर ९५.३० टक्के आहे.

खेड तालुक्यातील ७४ वर्षाच्या पुरुष रुग्णाचा मृत्यू गेल्या काल झाला. त्याची नोंद आज झाली. त्यामुळे जिल्ह्यातील मृतांची एकूण संख्या ३५८ झाली असून, जिल्ह्याचा मृत्युदर ३.६७ टक्के आहे.

सिंधुदुर्गातील परिस्थिती

सिंधुदुर्गात आज (१६ फेब्रुवारी) दुपारी १२ वाजता आलेल्या अहवालानुसार, नवे ६ करोनाबाधित आढळले, तर ३५ जण करोनामुक्त झाले. त्यामुळे करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या आता ६३६८ झाली आहे. आतापर्यंत करोनावर मात केलेल्यांची एकूण संख्या ६०२५ झाली आहे. सध्या जिल्ह्यात १७३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. कोकिसरे (ता. वैभववाडी) येथील ७० वर्षीय महिलेचा मृत्यू आज नोंदविला गेला. त्यामुळे जिल्ह्यात आतापर्यंत मरण पावलेल्यांची संख्या १७३ झाली आहे.

Follow Kokan Media on Social Media
Exit mobile version