चैत्र ते फाल्गुनपर्यंत हिंदू धर्माची कालगणना होत असते. विक्रमादित्याने १९४५ वर्षांपूर्वी आपल्या नावे संवत्सर सुरू केले. नवी कालगणना सुरू केली आणि वर्षारंभ सुरू केला. आतापर्यंत भारतावर बरीच सांस्कृतिक आणि धार्मिक आक्रमणे झाली. प्रत्येक धर्म/पंथानुसार वेगवेगळी कालगणना प्रचलित झाली, बदलत गेली. वर्षाचे १२ महिने कायमस्वरूपी असले तरी त्याची वेगळ्या प्रकारांनी गणना होऊ लागली. सुमारे ३६ महिन्यांनी तेरावा महिना अस्तित्वात आला. त्याला अधिक मास /मल मास /धोंडा मास म्हणू लागले.
हिंदू धर्मानुसार दिवसाचा प्रारंभ सूर्योदयापासून होतो, तर इंग्रजी कालगणनेनुसार मध्यरात्रीपासून सुरू होतो. भारतीय वर्षाची सुरुवात अर्थातच विजयोन्मादानेच होते. कारण तोच उन्माद, प्रेरणा, उत्साह, शक्ती वर्षअखेरपर्यंत टिकायची आणि टिकवायची असते. वास्तविक आलेला प्रत्येक दिवसच शुभ आणि चांगला असतो. कारण तो जीवनात नवीन उमेद आणि प्रेरणा आणत असतो, तरीही धार्मिक कार्य करताना मुहूर्त पाहिले जातात. तशी आपली रूढी-परंपरा आहे.
वास्तविक शुद्ध, स्वच्छ मन ठेवून कोणतेही चांगले कार्य केले आणि कधीही केले तरी ते चांगलेच आणि शुभदेखील असते. पण कधीकधी मुहूर्तामध्ये आपण फार अडकून पडतो. त्यातही शास्त्राने गुढीपाडवा, अक्षयतृतीया, दसरा आणि दिवाळीतील पाडवा [अर्धा] असे साडेतीन मुहूर्त सांगितले आहेत. त्या दिवशी शुभकार्यासाठी कोणताही मुहूर्त पाहावा लागत नाही, असे सांगितले आहे. कोणत्याही शुभकार्याचा प्रारंभ त्वरित करावा. त्याला वेळ लावू नये. अगदी शुभस्य शीघ्रम.. साहजिकच त्यावेळी मात्र मुहूर्त ही संकल्पना पूर्ण गौण ठरते.
भारतीय ज्योतिष आणि खगोलशास्त्रानुसार अंतराळात अनेक ग्रह, तारे, तारका, स्वतःभोवती प्रदक्षिणा घालीत असतात. साहजिकच आपापले गुरुत्वाकर्षण सांभाळूनच. शास्त्राने त्या भ्रमणाची गणना करण्यासाठी काही गोष्टी मांडल्या आहेत. पृथ्वी हा अंतराळातील अनेक ग्रहांपैकी एक ग्रह असून तो स्वतःभोवती फिरून सूर्याभोवती प्रदक्षिणा घालणारा आहे. त्याच पद्धतीने इतर अनेक ग्रहही फिरत आहेत. या कालगणनेच्या सोयीसाठी १२ राशी, २७ नक्षत्रे,१२ मास, ६ ऋतू तयार करण्यात आले आहेत. वर्षातील दोन महिन्यांसाठी एका ऋतूची संकल्पना पुढे आली आहे. असे वसंत ऋतूपासून शिशिर ऋतूपर्यंत सहा ऋतू आहेत. वर्षाची सुरुवात वसंत ऋतू आणि चित्रा नक्षत्रापासून होते. चित्रा नक्षत्र असलेल्या पौर्णिमेस चैत्री पौर्णिमा असे म्हणतात चित्रा नक्षत्रापासून चैत्र महिना संबोधले जाते.
थंडीचा कडाका जाऊन सर्वत्र सुखद, आल्हाददायक, प्रसन्न वातावरण निर्माण होते. आंब्याला फुटलेली कोवळी–कोवळी पालवी, त्याला लगडलेल्या छोट्या-छोट्या कैऱ्या, कोकिळेचे मधुर कूजन असे सारे प्रेरणादायी वातावरण असते. वर्षातील मासारंभ प्रत्येकालाच प्रेरणादायी, उत्साहवर्धक, उत्कंठा, मेहनत, जिव्हाळा, यश इत्यादी गोष्टींचे सूतोवाच करून जातो. ब्रह्मांड पुराणानुसार चैत्र शुद्ध प्रतिपदेला जगाच्या उत्पत्तीचा शुभारंभ झालेला आहे. वर्षभरात चैत्री आणि शारदीय अशी देवीची दोन नवरात्रे होत असतात. या दरम्यान देवीचे पूजन केले जाते. चैत्र महिना म्हणजे आदर्शांची मुहूर्तमेढच म्हणायला हवी. विष्णू अवतारी रामाने रावणाचा वध करण्यासाठी या महिन्यातील पवित्र नवमीच्या दिवशी अयोध्येत जन्म घेतला. कर्मयोगाचा आदर्श डोळ्यांपुढे ठेवून श्रीरामाने दैत्य प्रवृत्तीचा पुरता बीमोड केला आहे आणि विजयाची पताका सर्वत्र फडकविली. लंकेतून विजय प्राप्त करून झाल्यावर लक्ष्मण, सीता, मारुतीसह अन्य जणांचे विजयी पताका फडकवीत आगमन झाले आहे. श्रीरामाच्या सर्वत्र ईश्वरी शक्तीचा प्रत्यय साऱ्यांना आला. समाजाच्या जीवनातील त्यांच्यातील हरवलेला राम म्हणजे आत्मविश्वास परत मिळाला. तो विजयी प्रसंग नागरिकांनी गुढ्यातोरणे उभारून, पुष्पवृष्टी करून, पताका लावून, मंगल वाद्ये वाजवून साजरा केला होता. विजयोत्सवाने भारलेला हाच तो गुढी पाडवा. विजयोत्सवाची उत्साहाची संकल्पना एकच असते, ती म्हणजे अपप्रवृत्तीवर सत्प्रवृत्तीचे होणारे यशस्वी आक्रमण. त्यापुढे गुढ्या उभारणे, मिष्टान्न भोजन सेवन केवळ गौणच ठरावे.
गुढीपाडव्याच्या निमित्ताने कडुनिंबाच्या पानांचे सेवन आग्रहाने केले जाते. छान गोड गोड पक्वान्न त्यादिवशी खात असताना कडवट कडुलिंबाचे सेवन कशाला, असा प्रश्न कोणाच्याही मनात उद्भवणे स्वाभाविकच आहे. आपल्या पूर्वजांनी त्यामागे अध्यात्मासोबत आरोग्याचाही विचार केला आहे. कडुनिंब उत्तम प्रकारे आरोग्यकारक आहे. अनेक व्याधींवर तो उत्तम उपाय आहे. जंतुनाशक, चर्मरोग आणि व्याधिनिवारक, बाळंतपणाच्या वेळी तर तो फारच उपकारक ठरतो. गर्भाशयाच्या अनेक तक्रारी, समस्या दूर करण्याचे सामर्थ्य कडुलिंबात आहे. दुसरे असे की गोडासोबत कडवट चव म्हणजे सुखदुःखाची सतत आठवण करून देणारा आहे. संत तुकारामांनी आपल्या अभंगात म्हटलेच आहे, सुख पाहता जवापाडे, .दुःख पर्वताएवढे याचाच अर्थ असा की छोट्याशा सुखाचा अनुभव घेण्यासाठी दुःखाचे डोंगर पार करावे लागतात. सत्प्रवृत्ती, सद्गुण, सद्विचार, सुसंस्कृती,प्रेम इत्यादी गोष्टी आपल्या अंगी बाणवण्याचा आणि कृतीत आणण्याचा संकल्प वर्षाच्या प्रथम दिनीच करायचा असतो. तो केलेला संकल्प आणि प्रत्यक्ष कृती आपले भावी आयुष्य सुखी, संपन्न, यशस्वी, करेल यात शंकाच नाही. आपला समाज, राष्ट्र आरोग्यदृष्ट्या जर चांगले, सुदृढ, निकोप असेल तरच समाजात शांती, स्थैर्य नांदू शकते. राम-राज्याच्या संकल्पपूर्तीसाठी त्या सर्व गोष्टींची नितांत आवश्यकता आहे.
आमच्या संतमंडळींनी निसर्गाचा सदैव सहवास अपेक्षिला आहे ‘वृक्ष वल्ली आम्हा सोयरे वनचरे’ (संत तुकाराम). त्यानुसार अनेक वनस्पतींचा अभ्यास, प्राण्यांविषयी कृतज्ञताभाव जपणे गरजेचे आहे. पूर्वजांनी हे सगळे करण्याचा प्रयत्न केला आहे. कर्तृत्व, पराक्रम, आदर्श, शिक्षण इत्यादी गोष्टी पुढील पिढ्यांतून परंपरेने पुढे वाहून नेण्याचा उद्देश त्यामागे आहे. गुढीपाडव्याच्या निमित्ताने प्रत्येकाने काम करीत असताना रामदासस्वामी यांनी सांगितलेला कर्मयोग आणि भक्तियोगाचा आदर्श आचरावा. गुढीपाडव्याच्या निमित्ताने सर्वांचा आदर्श असलेल्या श्रीरामाच्या न्यायाच्या राज्याचा विचार आणि कृती होणेदेखील तितकेच अवश्यक आहे. अन्यथा एरव्ही साजरा केलेला गुढीपाडवा [केवळ खाणे, पिणे, मौजमजा] हा चंगळवादच ठरावा… तो तसा ठरू नये, हीच अपेक्षा!
- रामकृष्ण विनायक अभ्यंकर
- २/४६ भक्तियोग सोसायटी, परांजपे नगर,
- वझिरा नाका, बोरिवली (प.), मुंबई ४०००९१
- (संपर्क – ९८१९८४४७१०)




