रत्नागिरी : लाडकी बहीण योजनेसंबंधी लाडक्या बहिणीशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी संवाद कार्यक्रमाचे आयोजन भाजपने राज्यभरात केले. रत्नागिरीत दि यश फाउंडेशन नर्सिंग कॉलेजच्या क्रीडांगणावर झाला. या कर्यक्रमाला महिलांचा उदंड प्रतिसाद लाभला. मिऱ्या येथील मानसी मनोज पेजे या महिलेला श्री. फडणवीस यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली. त्यांनी योजनेबद्दल समाधान व्यक्त केले.
मुंबईत अंधेरी येथे झालेल्या कार्यक्रमाचे रत्नागिरीत प्रक्षेपण करण्यात आले. यावेळी विधानसभा क्षेत्रप्रमुख बाळ माने म्हणाले की, लाडक्या बहिणीसाठी देवाभाऊंनी लाडकी बहीण योजना जाहीर केली. त्याचे दोन हप्ते जमा झाले आहेत. केंद्रात मोदी यांचे सरकार तिसऱ्या वेळेला निवडून दिले. त्याचप्रमाणे महाराष्ट्र विधानसभासुद्धा जिंकायची आहे. नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येसुद्धा आपल्याला आपले सरकार आणायचे आहे. त्यामुळे पार्लमेंट ते पंचायत या सगळ्या एका विचाराच्या सरकारच्या माध्यमातून आपल्याला सर्वांचा सर्वांगीण विकास करायचा आहे. सबका साथ सबका विकास सबका प्रयास अशा माध्यमातून आदरणीय नरेंद्र मोदींचे नेतृत्व आज जगाला गवसणी घालताना आपण पाहत आहोत आणि २०४७ ला आपला देश आपण विकसित देश झाला पाहिजे, अशा प्रकारचा संकल्प आपण सगळ्यांनी केला आहे. चांगल्या निकोप लोकशाहीचे नेतृत्व आपण करत आहोत. पुढची पिढी आपल्याला स्वातंत्र्याचा शतक महोत्सव पाहणारी आहे. या पिढीसाठी आपल्याला सर्वांगीण विकास करण्याकरिता आपल्याला नियोजन करायचे आहे.
यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांनी सांगितले की, ग्रामीण भागातल्या ज्या स्त्रिया आहेत या स्त्रियांकडे एक स्वतःचे दर महिन्याला पैसे असावेत, या पैशातून तिने स्वतःच्या आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. सासू-सासऱ्यांच्या आरोग्यासाठी पैशाची गरज लागली तर त्यांनी तिने ते पैसे स्वतः खर्च केले पाहिजेत. याकरिता तिला दरमहिन्याला दीड हजार रुपये दिले जाणार आहेत.
श्री. सावंत म्हणाले, देवाभाऊंवर लक्ष ठेवा आणि रत्नागिरीत सुरेंद्रभाऊ यांच्यावरही लक्ष ठेवा. बाळासाहेब १९९९ साली निवडून आले. नंतरच्या २००४ च्या निवडणुकीत त्यांना दुर्दैवाने पराभव पत्करावा लागला. परंतु या काळात याच भगिनींची सेवा ते करत आहेत. रत्नागिरीत नर्सिंग कॉलेज सुरू करून त्यांनी हजारो बहिणींना आत्मनिर्भर केले आहे. खऱ्या अर्थाने महिलांना सक्षम केले आहे. त्यामुळे यापुढे रत्नागिरीचे आमदार म्हणन बाळासाहेब मानेंना निवडून द्यायला या भगिनींनी विसरू नये.
भाजप महिला जिल्हाध्यक्ष सुजाता साळवी यांनी या योजनेविषयी आभार मानले. रत्नागिरीत बाळासाहेब माने आमदार व्हावेत, अशी लाडक्या बहिणीची इच्छा आहे, आमचे आशीर्वाद आहेत असे सांगितले.


कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

