रत्नागिरी : रत्नागिरीच्या लांजा तालुक्यातील पुनस गावचे सुपुत्र ॲड. सूरज सदानंद मोरे यांची जिल्हा न्यायाधीशपदी निवड झाली आहे. रत्नागिरी बार असोसिएशन या वकिलांच्या बारमधून जिल्हा न्यायाधीश म्हणून निवड झालेले ते पहिलेच वकील आहेत. रत्नागिरी जिल्हा न्यायालयात गेली १६ वर्षे वकिली व्यवसाय करणारे ॲड. मोरे यांची ही निवड मुंबई उच्च न्यायालयाने घेतलेल्या परीक्षेतून झाली आहे.
मुंबई उच्च न्यायालयातर्फे दर वर्षी जिल्हा न्यायाधीश या पदासाठी परीक्षा घेतली जाते. पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत याद्वारे ही निवड केली जाते. या निवडप्रक्रियेला सर्वसाधारणपणे एक वर्ष इतका कालावधी लागतो. मुख्य परीक्षेचे दिवाणी व फौजदारी या विषयांचे पेपर उच्च न्यायालयाचे न्यायाधीश तपासतात. तसेच, मुलाखतदेखील त्यांच्याकडूनच घेतली जाते. या तिन्ही परीक्षांमध्ये यशस्वी होऊन ॲड. मोरे यांनी हे पद प्राप्त केले आहे. दिवाणी आणि फौजदारी खटले चालवण्याचा १६ वर्षांचा अनुभव त्यांना आहे. कमी कालावधीमध्ये त्यांनी उत्तम प्रकारे कार्य करून गरजूंना न्याय मिळवून दिला आहे. जिल्हा न्यायाधीश म्हणून ते आता न्यायदानाचे अत्यंत पवित्र काम करणार आहेत. त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड
Follow Kokan Media on Social Media

