रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात करोनामुळे होणारा मृत्युदर कमी करण्यासोबतच रुग्णांसाठी प्लाझ्मा थेरपी सुरू करण्याचा प्रस्ताव पाठवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय रत्नागिरी जिल्हास्तरीय करोना टास्क फोर्सच्या बैठकीत आज (३० जून) झाला. त्या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर मुंबई आणि अन्य मोठ्या शहरांप्रमाणेच रत्नागिरीतही करोनाबाधित रुग्णांवर प्लाझ्मा थेरपीचा उपचार करणे शक्य होणार आहे.
नव्यानेच स्थापन झालेल्या टास्क फोर्सची बैठक जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या अध्यक्षतेखाली येथील जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. जिल्ह्यात करोनाचा पहिला रुग्ण गेल्या आठ मार्च रोजी सापडला होता. त्यानंतर शून्यावर गेलेला करोनाबाधितांचा आकडा आता ५९९पर्यंत वाढला आहे. या पार्श्वभूमीवर रुग्णनिहाय, वय आणि लिंग यांच्या आधारे रुग्णसंख्येत झालेल्या वाढीबाबत या वेळीसादरीकरणातून आढावा घेण्यात आला. कॅच देम अर्ली अर्थात रुग्ण तपासणीचा वेग वाढवून लवकर निदान करणे आणि अर्ली रेफर अर्थात रुग्णाची प्रकृती बघून तातडीने त्यासाठी विशेषज्ञाचा सल्ला घेऊन उपचार करणे या माध्यमातून मृत्युदर कमी करण्याबाबत चर्चा झाली.
आयसीएमआरने काही नव्या औषधप्रणालीचाही सल्ला जारी केला आहे. त्यामध्ये टोसिलीझूमॅप हे इन्जेक्शन, तसेच रेमडेसीवीर आणि फ्लॅबीसीवीर या गोळ्यांचा वापर सुचविण्यात आला आहे, यावरही चर्चा झाली. प्लाझ्मा थेरपीचा करोनाबाधितांना लाभ होत असून, त्यामुळे मृत्यूचे प्रमाण कमी होत आहे. जिल्ह्यात अशी उपचारप्रणाली सुरू करण्याबाबत आयसीएमआरला प्रस्ताव पाठवण्याचा निर्णय बैठकीत झाला.
मुंबईहून येणाऱ्या महिला अणि विशेषत: जिल्ह्यातील गर्भवती महिलांची तपासणी वाढविण्याचा निर्णयही या वेळी झाला. जिल्हा रुग्णालयात नियमित रुग्ण उपचारांसोबत संशोधन कार्यदेखील होण्याची आवश्यकता आहे. याबाबत बैठकीत चर्चा झाली.
बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी दत्ता भडकवाड, मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बघाटे, तसेच कमिटीचे सदस्य असलेले खासगी वैद्यकीय व्यावसायिक उपस्थित होते.
……
