रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (२६ सप्टेंबर) १८४ जण करोनामुक्त झाले. आतापर्यंत ५८९६ जणांनी करोनावर मात केली असून, बरे होण्याचा दर आता ८२.८७ टक्क्यांवर पोहोचला आहे. देशाचा करोनामुक्तीचा दर ८२.१ टक्के असून रत्नागिरी जिल्ह्याचा बरे होण्याचा दर देशापेक्षा अधिक झाला आहे. सिंधुदुर्गात आतापर्यंत २३७६ जणांनी करोनावर मात केली आहे.
रत्नागिरीतील परिस्थिती
रत्नागिरी जिल्ह्यात नव्या करोनाबाधित रुग्णांच्या संख्येतही कालच्या १४४ रुग्णांच्या तुलनेत आज (२६ सप्टेंबर) घट झाली. आज नवे ४४ रुग्ण आढळले. त्यामुळे जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण बाधितांची संख्या ७११४ झाली आहे. आजच्या रुग्णांचा चाचणीनिहाय तपशील असा – आरटीपीसीआर – रत्नागिरी ४, राजापूर ३ (एकूण ७). रॅपीड अँटिजेन टेस्ट – गुहागर २, चिपळूण १४, संगमेश्वर १, रत्नागिरी १८, लांजा २. (एकूण ३७).
आज करोनाबाधित पाच रुग्णांचा रुग्णांचा मृत्यू झाला. त्यापैकी चौघे शासकीय रुग्णालयात, तर एक जण खासगी रुग्णालयात मरण पावला. त्यामुळे जिल्ह्यात करोनामुळे मरण पावलेल्यांची संख्या २४५ झाली आहे. आज मरण पावलेले सर्व रुग्ण पुरुष आहेत. त्यांचा तपशील असा – रत्नागिरी वय ४८ आणि ५६, दापोली वय ६५, चिपळूण वय ५३, लांजा वय ७० (लांज्यातील मृत्यू १९ सप्टेंबर रोजी झाला होता.) जिल्ह्याचा मृत्युदर ३.४४ टक्के झाला आहे.
सिंधुदुर्गातील परिस्थिती
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (२६ सप्टेंबर) आणखी ७७ व्यक्तींचे अहवाल करोना पॉझिटिव्ह आले. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या आता ३५५० झाली आहे. आतापर्यंत २३७६ जण बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात १०९७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अद्याप १५८ अहवाल प्रलंबित आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील ७७ जणांचा करोनामुळे बळी गेला आहे. सध्या जिल्ह्यात ४८६९ व्यक्ती गृह आणि शासकीय संस्थात्मक विलगीकरणात आहेत. नागरी क्षेत्रात संस्थात्मक विलगीकरणात १२ हजार ९३७ व्यक्ती आहेत.
