रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (२० ऑक्टोबर) केवळ नऊ नव्या रुग्णांची नोंद झाली. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या ८२४२ झाली आहे. रोजच्या रुग्णसंख्येत केवळ एक आकडी संख्येने वाढ झाल्याची ही परिस्थिती बऱ्याच दिवसांनी आली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज २८ नव्या करोनाबाधितांची वाढ झाली असून, एकूण रुग्णसंख्या ४६०९ झाली आहे.
रत्नागिरीतील परिस्थिती
रत्नागिरी जिल्ह्यात आज (२० ऑक्टोबर) ३३ रुग्णांना बरे वाटल्यामुळे घरी पाठविण्यात आले. त्यामुळे बरे झालेल्यांची संख्या ७६०९ झाली आहे. करोनामुक्तीचा हा दर ९२.३१ टक्के आहे.
जिल्ह्यात आज नवे ९ रुग्ण आढळले असून, सर्व रुग्ण रॅपिड अँटिजेन टेस्टमध्येच पॉझिटिव्ह असल्याचे निश्चित झाले आहे. त्यांचा तालुकानिहाय तपशील असा : खेड २, चिपळूण २, रत्नागिरी ५ (एकूण ९)
जिल्ह्यातील बाधितांची एकूण संख्या आता ८२४२ झाली आहे. बाधितांचा दर १५.२० टक्के आहे. सध्या २४४ रुग्णांवर जिल्ह्यात उपचार सुरू आहेत.
जिल्ह्यात गेल्या २४ तासांत तिघांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. त्यापैकी दोन मृत्यू सरकारी, तर एक मृत्यू खासगी रुग्णालयात झाला आहे. गुहागर तालुक्यातील ८० वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू १९ ऑक्टोबर रोजी झाला, तर चिपळुणातील ६३ वर्षीय आणि राजापुरातील ५२ वर्षांच्या पुरुष रुग्णांचा मृत्यू २० ऑक्टोबर रोजी झाला. मृतांची एकूण संख्या आता ३०८ झाली असून, जिल्ह्याचा मृत्युदर ३.७३ टक्के आहे.
मृतांची तालुकानिहाय संख्या – रत्नागिरी ८२, खेड ४९, गुहागर १२, दापोली ३२, चिपळूण ७३, संगमेश्वर ३२, लांजा ११, राजापूर १४, मंडणगड ३.
सिंधुदुर्गातील परिस्थिती
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (२० ऑक्टोबर) २८ व्यक्तींचा अहवाल करोना पॉझिटिव्ह आला. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णांची संख्या आता ४६०९ झाली आहे. आतापर्यंत ३९५३ जण बरे होऊन घरी परतले आहेत. आज ५८ जण करोनामुक्त झाले आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्यात ५०८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत जिल्ह्यातील १२१ जणांचा करोनामुळे बळी गेला आहे. सावंतवाडीतील समाजमंदिर येथील एका ५६ वर्षीय महिलेचा आज मृत्यू झाला.
मृतांची तालुकानिहाय संख्या : देवगड ८, दोडामार्ग २, कणकवली ३०, कुडाळ २१, मालवण १३, सावंतवाडी ३०, वैभववाडी ७, वेंगुर्ला ९, जिल्ह्याबाहेरील रुग्ण १

