रत्नागिरी : येथील स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेच्या दसरा-दिवाळी स्वागत ठेव योजनेच्या पहिल्या दिवसापासूनच संस्थेत ठेवींचा ओघ सुरू झाला आहे. या योजनेत प्रधान कार्यालयासह सर्व शाखा मिळून २ कोटी ५० लाखांच्या ठेवी जमा झाल्या असून सर्वच शाखांमध्ये मोठ्या प्रमाणावर ठेवी जमा होत असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष अॅड. दीपक पटवर्धन यांनी दिली.
घटस्थापनेला सुरू झालेल्या संस्थेच्या दसरा दिवाळी स्वागत ठेव योजनेचा ठेव उपक्रम समाजाच्या सर्व वर्गात सर्वदूर पसरल्याचे प्रतिसादावरून लक्षात येते. ग्राहक व्याजदरापेक्षा सुरक्षिततेला प्राधान्य देत असल्याचे दिसून येत आहे. संस्था आपल्या जुन्या ठेवीदारांना एसएमएसच्या माध्यमातून गुंतवणूक करण्याचे आवाहन करत आहे. ठेवीदारांच्या या भरघोस प्रतिसादामुळे आमचेवरील जबाबदारी वाढली असून सदर जमा होणारी रक्कम कर्जाच्या रूपाने वितरित केली जाईल, असे अध्यक्षांनी सांगितले. संस्थेत ठेववाढीचे प्रमाण ७.३८ टक्के असून सी.डी.रेशो ५९.२८ टक्के आहे. संस्थेची ऑक्टोबर २०२० अखेरची कर्जवसुली ९८.५४ टक्के असून संस्थेची बँक गुंतवणूक १०३ कोटी आहे.
पतसंस्थेने आकर्षक अशा १२ ते १८ महिन्यांच्या स्वरूपांजली ठेव योजनेकरिता ७ टक्के व्याजदर देऊ केला असून १९ ते ३५ महिन्यांच्या सोहम ठेव योजनेत ज्येष्ठ नागरिक व महिलांकरिता ७.१० टक्के व्याजदर आहे. या दोन्ही योजनेत जास्तीत जास्त ठेवीदारांनी गुंतवणूक करावी, असे आवाहन श्री. पटवर्धन यांनी केले आहे.

