रत्नागिरी/सिंधुदुर्गनगरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज (१६ नोव्हेंबर) आठ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली, तर पाच जण करोनामुक्त झाले. सिंधुदुर्गात आज नवे सात रुग्ण आढळले, तर दोन जणांना बरे वाटल्याने घरी पाठविण्यात आले.
रत्नागिरीतील परिस्थिती
रत्नागिरी जिल्ह्यात आज पाच रुग्णांना बरे वाटल्यामुळे घरी पाठविण्यात आले. त्यामुळे बरे झालेल्यांची संख्या ८११८ झाली आहे. करोनामुक्तीचा हा दर ९४.४६ टक्के आहे.
आज सापडलेल्या बाधितांचा तपशील असा – आरटीपीसीआर – रत्नागिरी १, चिपळूण १ (एकूण २), रॅपिड अँटिजेन टेस्ट – रत्नागिरी १, दापोली १, खेड १, चिपळूण १, संगमेश्वर १, लांजा १ (एकूण ६) (दोन्ही मिळून ८)
जिल्ह्यातील बाधितांची एकूण संख्या आता ८५९४ झाली आहे. बाधितांचा दर १४.४५ टक्के आहे. सध्या ८३ रुग्णांवर जिल्ह्यात उपचार सुरू आहेत. त्यापैकी २२ जण होम आयसोलेशनमध्ये आहेत.
जिल्ह्यात गेल्या २४ तासांत एकाही रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली नाही. जिल्ह्यात करोनामुळे मरण पावलेल्यांची एकूण संख्या ३१९ आहे. जिल्ह्याचा मृत्युदर ३.७१ टक्के आहे.
मृतांची तालुकानिहाय संख्या अशी – रत्नागिरी ८७, खेड ५१, गुहागर १२, दापोली ३२, चिपळूण ७६, संगमेश्वर ३३, लांजा ११, राजापूर १४, मंडणगड ३.
सिंधुदुर्गातील परिस्थिती
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज (१६ नोव्हेंबर) सात नव्या करोनाबाधितांची वाढ झाली असून, एकूण रुग्णसंख्या ५०७७ झाली आहे. सध्या १४३ जण उपचारांखाली आहेत. आज करोनामुक्त झालेल्या दोन जणांसह जिल्ह्यातील एकूण करोनामुक्तांची संख्या ४७९५ आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील १३३ जणांची करोनाविरुद्धची लढाई अयशस्वी झाली. कणकवली तालुक्यातील भिरवंडे गावातील एका आणि सांगवे गावातील एका व्यक्तीचा आज करोनामुळे मृत्यू झाला.