रत्नागिरी : पुढच्या वर्षापासून राज्यातील विद्यापीठांमध्ये जलविषयक पदवी अभ्यासक्रम सुरू करण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी आज रत्नागिरीत केली.
रत्नागिरी जिल्हा जलसाक्षरता समिती, हिरवळ प्रतिष्ठान आणि पुण्यातील यशदा संस्थेच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या जलकार्यशाळेच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असलेले जलपुरुष राजेंद्रसिंह राणा यांनी केलेल्या सूचनेची त्वरित दखल घेऊन श्री. सामंत यांनी ही घोषणा केली. कार्यशाळेचे उद्घाटन श्री. सामंत आणि श्री. राजेंद्रसिंह यांच्या हस्ते झाले. जिल्ह्यातील नद्यांच्या पाण्याने तुलसीपूजन करून कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. मान्यवरांचा सत्कार करताना सत्कारमूर्तींना मातीपासून बनवलेले तांब्याभांडे देण्यात आले.
श्री. सामंत पुढे म्हणाले, उच्च आणि तंत्रशिक्षण विभागामार्फत राज्यभरात जलसाक्षरता आणि जलशक्ती अभियान राबविले जाईल. जिल्ह्यात पाणी वापर संस्था आणि जलदूतांची नेमणूक करून वर्षअखेरीपूर्वी राजेंद्रसिंह राणा आणि जलनायक किशोर धारिया यांच्या उपस्थितीत कृषी विद्यापीठात बैठक घेतली जाईल. जलशक्तीसाठी सर्वपक्षीय राजकीय ताकद उभी करू. याकरिता तज्ज्ञ द्यावेत, आमचा विभाग खर्च करेल. उद्घाटनाचा कार्यक्रम मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आणि समाराोपाचा कार्यक्रम राजेंद्रसिंग यांच्या हस्ते करू.
श्री. राजेंद्रसिंह म्हणाले की, बदलते हवामान आणि पाऊसमान यांचा परिणाम शेतीवर होत आहे. हे चक्र बिघडल्यामुळेच उत्पादन मिळत नाही. त्यामुळे बदलते हवामान, पाऊस आणि पीकपद्धती यांचा अभ्यास करण्यासाठी टास्क फोर्स नेमण्याची गरज आहे. पाठ्यपुस्तकांत पाण्याविषयीचे महत्त्व मांडावे आणि जलउपयोग दक्षतेसंदर्भात पदवी अभ्यासक्रम सुरू करावा. हवामान बदल आणि पाण्याचे विज्ञान समजून घेतले पाहिजे. अन्यथा महाराष्ट्राला कोणीही वाचवू शकत नाही. हवामान बदलामुळे पाऊसमान बदलल्याने शेतीतून उत्पन्न मिळत नाही. त्यासाठी पाऊस आणि शेतीची सांगड घातली पाहिजे. महाराष्ट्राला जलसाक्षरतेची सर्वाधिक गरज आहे. पाणी भरपूर आहे पण त्यामुळे त्याची किंमत नाही. पंचमहाभूते म्हणजेच भगवंत आहे. कोकण हा भगवंताचा सर्वांत लाडका प्रदेश आहे. येथे सर्वाधिक पाऊस पडतो. येथे भरपूर धरणे झाली. पण पाण्याची दक्षता घेतली जात नाही.

हिरवळचे किशोर धारिया म्हणाले की, जिल्ह्यातील ५४ धरणांतील ५०० दशलक्ष घनमीटर पाण्याचा वापर आणि व्यवस्थापन याकरिताच शाश्वत एकसूत्री कार्यक्रम राबवू या. कृती आराखडा तयार करून अंमलबजावणी करू या.
दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झालेले पालकमंत्री अनिल परब म्हणाले की, रत्नागिरी जिल्हा सुजलाम, सुफलाम बनवण्यासाठी पाणी हवे. त्यामुळे शाश्वत पाण्याचे व्यवस्थापन करावे, शासन त्यात पूर्ण सहभाग घेऊन ताकद देऊ. जलव्यवस्थापन आणि जलसाक्षरतेसाठी राबविण्यात आलेला हा एका चांगला उपक्रम आहे.
जलसंपदामंत्री जयंत पाटीलही परिषदेला दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले. त्यांनी जलपरिषदेतून शाश्वत आराखडा बनवा, त्याला शासन म्हणून सर्व ती शक्ती देऊ, अशी ग्वाही दिली. तसेच कोकणातील धरणे उभारणी, पाणी साठवणुकीसाठी आणि योजनांसाठी बळ देऊ, असे सांगितले.
व्यासपीठावर यशदाचे उपमहासंचालक डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील, जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, माजी आमदार बाळ माने, संजय यादवराव आदी उपस्थित होते. जलनायक आणि हिरवळ प्रतिष्ठानचे प्रमुख किशोर धारिया यांनी उदय सामंत यांचा शाल, पुष्परोपटे आणि मातीच्या कलात्मक घड्यांची फ्रेम देऊन सत्कार केला. या वेळी पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता जगदीश पाटील प्रास्ताविकामध्ये परिषदेच्या आयोजनाचा हेतू सांगितला.
पर्यटनमंत्री आदिती तटकरे, केंद्रीयमंत्री सुरेश प्रभु, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार शेखर निकम, आमदार निरंजन डावखरे, आदींचे शुभेच्छा संदेश दाखवण्यात आले.
जिल्हाभरातील संस्था आणि विद्यार्थी परिषदेला उपस्थित होते.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड