रत्नागिरी : चोवीस वर्षांपेक्षा अधिक परंपरा असलेला स्वामी स्वरूपानंद पतसंस्थेचा ठेववृद्धी मास उद्यापासून (दि. २० जून) सुरू होत असून तो २० जुलैपर्यंत चालणार आहे, अशी माहिती अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांनी दिली.
पतसंस्थेत १२ ते १८ महिने मुदतीच्या स्वरूपांजली ठेव योजनेमध्ये सर्वसाधारण ६.७५ टक्के, महिला तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी ७.०० टक्के, तसेच १९ ते ६० महिने मुदतीच्या सोहम ठेव योजनेमध्ये सर्वसाधारण ७.०० टक्के व महिला व ज्येष्ठ नागरिकांसाठी ७.२५ टक्के व्याजदर पतसंस्थेने देऊ केला आहे. तरी या आकर्षक व्याजदरांचा लाभ घ्यावा.
पतसंस्थेविषयी माहिती देताना श्री. पटवर्धन म्हणाले, १८ जून २०२२ अखेर संस्थेच्या ठेवी २५१ कोटी ७८ लाख झाल्या असून कर्जे १६९ कोटी ७८ लाख एवढी झाली आहेत. संस्थेची गुंतवणूक १२४ कोटी ३४ लाख असून संस्थेचा स्वनिधी ३१ कोटी ८७ लाख असा आहे. संस्था आर्थिकदृष्ट्या भक्कम पायावर उभी असून जमा होणाऱ्या रकमेचे काटेकोर नियोजन संस्था करीत असते. संस्थेच्या रत्नागिरी तालुक्यामध्ये रत्नागिरी शहर व मारुतीमंदिर, कोकणनगर, कुवारबाव, पावस, जाकादेवी, खंडाळा, पाली, मालगुंड अशा शाखा असून तालुक्याबाहेर चिपळूण, साखरपा, देवरूख, नाटे, लांजा, राजापूर, पुण्यात कोथरूड तसेच देवगड-जामसंडे येथे शाखा आहेत.
या सर्व शाखांमध्ये या ठेव योजनांचा लाभ ग्राहकांना मिळणार असून जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत यानिमित्ताने पोहोचण्याचे नियोजन संस्थेने केले आहे, अशी माहितीही ॲड. पटवर्धन यांनी दिली. ठेववृद्धी मासात मोठ्या प्रमाणावर संस्थेच्या ठेव योजनांमध्ये गुंतवणूक करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. आजवरची संस्थेची विश्वासार्हता व उत्तम ग्राहक सेवा, ठेवीदारांचा संस्थेबद्दल असलेला स्नेहभाव आणि संस्थेची उत्तम आर्थिक स्थिती या बळावर १० कोटींपेक्षा अधिक ठेवी या ठेववृद्धी मासात जमा होतील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड