ऑगस्ट क्रांतिदिनी ‘१९४२ चिपळूण’चे प्रकाशन

चिपळूण : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्ताने येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिरातर्फे ‘१९४२ चिपळूण’ या ग्रंथाचे येत्या ऑगस्ट क्रांतिदिनी (दि. ९ ऑगस्ट) प्रकाशन होणार आहे.

चिपळूण येथील स्वातंत्र्यसैनिकांनी ७ सप्टेंबर १९४२ रोजी शहरात मिरवणूक काढून सत्याग्रह केला. गांधी चौकात भाषणे झाली. त्यानंतर पोलीस आणि स्वातंत्र्यसैनिक यांच्यात संघर्ष झाला. या सत्याग्रहात २३ सत्याग्रही कारावासात गेले. त्यातील पाच जणांना सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली गेली. न्यायालयात या सत्याग्रहींची बाजू तत्कालीन नामवंत वकील सोबळकर यांनी मांडली. न्यायालयाने दिलेल्या याबाबतच्या निकालपत्राची प्रत वाचनालयाला उपलब्ध झाली. ती संकलित करण्यात आली असून भारतीय स्वातंत्र्याच्या यंदाच्या अमृतमहोत्सवी वर्षात वाचन मंदिराच्या आप्पासाहेब जाधव अपरान्त संशोधन केंद्रातर्फे येत्या या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे.

स्वातंत्र्य आंदोलन काळात चिपळूण येथील सत्याग्रहात पोलिसी लाठीहल्ल्याविरुद्ध झालेल्या हल्ल्यात दाखल झालेले आरोपपत्र आणि त्यावरील रत्नागिरीतील सेशन कोर्टाचा वाचनालयाकडे संग्रहित असलेला निकाल माजी अध्यक्ष कै. तात्या कोवळे यांनी मिळवला होता. हा खटला चिपळूणचे मामलेदार लांबाते यांच्यासमोर चालला. विशेष म्हणजे १९६३ साली ज्यांनी काही दिवस महाराष्ट्राचे मुख्यमंत्रिपद भूषविले, त्या कै. पी. के. सावंत यांचे वडील कृष्णाजी सावंत तेव्हा पोलीस हेडकॉन्स्टेबल होते. या संघर्षात त्यांना आणि त्यांच्या समवेत असलेल्या पोलिसांना मारहाण झाली. रत्नागिरीचे सेशन जज्ज एन. एम. मियाभॉय यांनी १० मे १९४३ रोजी याबाबत निकाल दिला. त्यातील २३ पैकी १५ जणांना मुक्त करण्यात आले, तर आठ जणांना शिक्षा झाली. ‘१९४२ चिपळूण’ हे संपादित पुस्तक त्याचे मराठी भाषांतर आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील स्वातंत्र्य आंदोलनाचा इतिहास सविस्तर साधनासाहित लिहिण्याचा दृष्टिकोन समोर ठेवून इतिहासाचे व्यासंगी अभ्यासक आणि ज्येष्ठ साहित्यिक प्रकाश देशपांडे यांनी या पुस्तकाचे संपादन केले आहे. मूळ इंग्रजी निकालपत्राचे भाषांतर शालन रानडे यांनी केले आहे. पुण्याच्या दिलीपराज प्रकाशनातर्फे पुस्तक प्रकाशित होत आहे. वाचनालयाने हे पुस्तक देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झालेल्या अपरान्तातील स्वातंत्र्यवीरांना अर्पण केले आहे.

भारतीय स्वातंत्र्यलढ्यात ‘अपरान्त’भूमीचे योगदान अमूल्य आहे. रत्नागिरी जिल्हा ही भारतीय असंतोषाचे जनक लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधींचे राजकीय गुरू गोपाळ कृष्ण गोखले यांची जन्मभूमी आहे. चिपळूणच्या सत्याग्रहात कारावासात गेलेल्या २३ सत्याग्रहींपैकी ज्ञानू बळवंत देशमुख, सीताराम भिकू कन्हाळ, गोपाळ लक्ष्मण लवेकर, नारायण रामचंद्र वेल्हाळ, रामकृष्ण महादेव गांधी, अनंत नारायण हटकर, सदाशिव विठ्ठल शेट्ये, रामकृष्ण सखाराम रेडीज यांना शिक्षा झाली, तर जनार्दन गोपाळ वेल्हाळ, महादेव गोपाळ कापडी, श्रीकृष्ण तुकाराम कोलगे, अनंत सीताराम कोलगे, सीताराम विष्णू आवले, परशुराम विष्णू आवले, गोपाळ नारायण राऊत, विठोबा शंकरशेठ टाकळे, सीताराम महादेव खातू, नथुराम त्र्यंबक वाडेकर, विठोबा पुंडलिक चौधरी, महादेव सीताराम जागुष्टे, भिकू गोपाळ विंचू, कृष्णाजी महादेव बापट, रघुनाथ गोविंद रेडीज यांची सुटका झाली. पुस्तक प्रकाशन सोहळ्यात २३ देशभक्तांच्या कुटुंबांचा प्रतीकात्मक सन्मान केला जाणार आहे. पुस्तकाचे प्रकाशन आमदार शेखर निकम यांच्या हस्ते होईल. ज्येष्ठ पत्रकार आणि साप्ताहिक कोकण मीडियाचे संपादक प्रमोद कोनकर समारंभाचे अध्यक्ष असतील.

यानिमित्ताने कोकणातील दिनकरशास्त्री कानडे, केशवराव जोशी, मोहन धारिया आदी पाच ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिकांची तैलचित्रे कलादालनात लावण्याचा निर्णय वाचनालयाने घेतला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण सत्याग्रहात कारावासात गेलेल्या २३ देशभक्त सत्याग्रहींच्या वंशजांनी, कुटुंबीयांनी वाचनालयाशी संपर्क साधावा. वाचनालयाच्या बाळशास्त्री जांभेकर सभागृहात ९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ वाजता होणाऱ्या या कार्यक्रमास चिपळूणवासीयांनी उपस्थित राहून देशभक्तांना मानवंदना द्यावी, असे आवाहन वाचनालयाचे अध्यक्ष डॉ. यतीन जाधव, कार्याध्यक्ष धनंजय चितळे, कार्यवाह विनायक ओक यांनी केले आहे.

कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

Follow Kokan Media on Social Media
Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply