रत्नागिरी : निवळी (ता. रत्नागिरी) गावातून शहरात स्थलांतरित झालेल्या चाकरमान्यांच्या विकासाच्या संकल्पना ग्रामपंचायतीत मांडण्यासाठी आणि लोकांच्या सहभागातून गावाचा विकास साधण्यासाठी चाकरमान्यांकरिता विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्याचा निर्णय निवळीचे सरपंच दैवत पवार यांनी घेतला आहे.
श्री. पवार म्हणाले की, गावातून शिक्षण घेऊन मुंबई, पुणे,सांगली किंवा अन्य शहरात गेलेल्या तरुण-तरुणींना गावाच्या विकासाबाबत आपले व्हिजन मांडता यावे, विकासाबाबत आपल्या नवीन संकल्पना मांडता याव्यात, त्यांच्या सहभागातून गावाचा सर्वांगीण विकास साधता यावा, यासाठी सर्व चाकरमान्यांच्या सोयीने ग्रामसभा घेऊन त्यांचाही विचार गावाच्या विकासात गृहीत धरला जावा, अशा सूचना गाव विकास समितीचे संघटन प्रमुख सुहास खंडागळे यांनी मला केल्या होत्या. त्याचा विचार करून जनतेच्या हितासाठी आणि स्थलांतरित झालेल्या तरुणांच्या गावाबद्दलच्या विकासाच्या संकल्पना समजून घेण्यासाठी चाकरमान्यांसाठी मे महिना किंवा गणेशोत्सवात चाकरमानी लोकांना योग्य वाटेल त्या दिवशी विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात येणार आहे.
नियमित ग्रामसभेत गावातील मतदार असणाऱ्यांनाच आपले विचार मांडण्याची संधी मिळते. मात्र या विशेष ग्रामसभेत गावातून कामानिमित्त बाहेर गेलेले पण ज्यांना गावाच्या विकासाची जाण आहे, त्या गावाचे मतदार असणारे व मतदार नसणारे या सर्वांना त्यांचे व्हिजन मांडता येईल, असे श्री. पवार म्हणाले.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

