रत्नागिरी : कृ. चिं. आगाशे विद्यामंदिरने आपला ठसा राज्यातही उमटवावा, असे प्रतिपादन शाळेचे माजी विद्यार्थी व प्रसिद्ध डॉक्टर अलिमियॉं परकार यांनी केले.
मुख्यमंत्री माझी शाळा अभियानातील यशाबद्दल शाळेत आज, १६ मार्च रोजी आयोजित कौतुक सोहळ्यात ते बोलत होते. मुख्यमंत्री माझी शाळा या ४५ दिवसांच्या पहिल्याच अभियानामध्ये जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या आगाशे विद्यामंदिरचे त्यांनी कौतुक केले. ते पुढे म्हणाले, सुवर्णपदक विजेते गुरुवर्य अच्युतराव पटवर्धन यांचे विद्यार्थी आज भारत शिक्षण मंडळ सुरेख पद्धतीने चालवत आहेत. यामुळेच पटवर्धन हायस्कूल, आगाशे विद्यामंदिरची घोडदौड सुरू आहे.
यावेळी शाळा समिती अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर केळकर म्हणाले की, हे यश एका दिवसात मिळालेले नाही. त्याकरिता अनेक दिवस झटणारे शिक्षक आणि पालकांचा वाटा आहे. सातत्यपूर्ण उपक्रम, उत्कृष्ट नियोजन, अच्युतराव पटवर्धन आणि जोग सरांची उच्चतम शैक्षणिक गुणवत्ता, कार्यानुभव, शालेय सुंदर परिसर, बालमनावरील संस्कार यांमुळे शाळेला यश मिळाले. याबद्दल सर्व शिक्षकांचे अभिनंदन करतो.
यावेळी प्रबंधक विनायक हातखंबकर, माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत, पालिका शिक्षण मंडळाचे प्रशासनाधिकारी सुनील पाटील, विस्तार शिक्षण अधिकारी संदीप कडव, भारत शिक्षण मंडळाचे कार्यवाह सुनील वणजू, चंद्रशेखर करंदीकर, सतीश दळी, धनेश रायकर, पटवर्धन हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक एल. एस. जोशी आणि विजय वाघमारे, मुख्याध्यापिका प्राजक्ता कदम, माजी मुख्याध्यापिका काळे आदी उपस्थित होते. कार्यक्रमात सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, मदत करणारे पालक, गुणवंत विद्यार्थी यांना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

