रत्नागिरी जिल्ह्यात आज ९८ जणांनी सादर केली नामनिर्देशनपत्रं; महायुतीच्या उमेदवारांनी शक्तिप्रदर्शन करून भरले अर्ज

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीसाठी नामनिर्देशनपत्र सादर करण्याच्या प्रक्रियेला आता वेग आला असून, आज (१५ नोव्हेंबर) जिल्ह्यात एकूण ९३ जणांनी सदस्यपदाकरिता, तर पाच जणांनी अध्यक्षपदाकरिता उमेदवारी अर्ज दाखल केले. रत्नागिरी, चिपळूण, खेड, राजापूर या नगर परिषदा आणि लांजा, गुहागर, देवरूख या नगर पंचायतींमध्ये निवडणूक होत आहे. रत्नागिरी नगर परिषदेच्या सदस्यपदासाठी १७, चिपळूणसाठी २६, खेड आणि राजापुरात प्रत्येकी तीन, गुहागर नगर पंचायतीसाठी १२, देवरूखसाठी २३, तर लांजा नगर पंचायतीसाठी नऊ जणांनी आज अर्ज सादर केले. चिपळूण नगराध्यक्षपदासाठी तिघांचे, तर देवरूख आणि लांजा नगर पंचायत अध्यक्षपदासाठी प्रत्येकी एक अर्ज आज सादर झाला. प्रक्रिया सुरू झाल्यापासून आतापर्यंत जिल्ह्यात एकूण १११ जणांचे सदस्यपदासाठी, तर १० जणांचे अध्यक्षपदासाठी अर्ज सादर झाले आहेत, अशी माहिती नगरपालिका प्रशासन शाखेचे जिल्हा सहआयुक्त वैभव गारवे यांनी दिली.
रत्नागिरी नगर परिषदेच्या निवडणुकीसाठी आज १७ जणांनी नामनिर्देशनपत्रं सादर केली. शिवसेनेच्या नऊ आणि भाजपच्या पाच उमेदवारांसह दोन अपक्ष उमेदवारांनी आणि प्रहार जनशक्ती पक्षाच्या उमेदवाराने आज आपला उमेदवारी अर्ज सादर केला. महायुतीच्या उमेदवारांचे अर्ज भरण्यापूर्वी पदयात्रा काढण्यात आली. त्या वेळी शिवसेना, भाजपसह महायुतीतल्या पक्षांचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. शिवसेना उपनेते डॉ. उदय सामंत, आमदार किरण सामंत, माजी आमदार राजन साळवी यांच्यासह भाजपचे आमदार निरंजन डावखरे, अ‍ॅड. दीपक पटवर्धन, सचिन वहाळकर आदी या वेळी उपस्थित होते. ‘महायुतीकडून आज पहिल्या टप्प्यात १५ अर्ज भरले असून, महायुती या निवडणुकीत नक्की विजयी होईल. आमचा नगराध्यक्षपदाचा उमेदवार १२ ते १४ हजार मताधिक्याने निवडून येईल,’ असा विश्वास डॉ. उदय सामंत यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.

This slideshow requires JavaScript.

Follow Kokan Media on Social Media

Something went wrong. Please refresh the page and/or try again.

Follow Kokan Media on Social Media

Leave a Reply