जागतिक पर्यटन दिन विशेष
हिरव्याकंच झाडांमध्ये विसावलेल्या रमणीय कोकणातील “द लँड ऑफ लेक” (तलावांची भूमी) म्हणून पुढे येणारा रत्नागिरी जिल्ह्यातील निसर्गसमृद्ध लांजा तालुका पर्यटन नकाशावर ‘लवेबल लांजा’ म्हणून आपली नवी ओळख करू पाहतो आहे. जागतिक पर्यटन दिनानिमित्ताने अशा लांजा तालुक्याची ओळख.
…………………………
लांजा म्हणजे समुद्रकिनारा नसलेला तालुका. मात्र तालुक्याचे मुख्यालय असलेल्या लांजा शहरातून मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग जात असल्याने महामार्गावरची मुख्य बाजारपेठ म्हणून लांजा शहर विकसित झाले. गेल्या काही वर्षांत कोकण पर्यटनाचे वारे जोरात वाहत असताना लांजा तालुक्यात पर्यटनस्थळांचे वैविध्य असतानाही जिल्हा अथवा कोकणच्या पर्यटन नकाशावर लांजा तालुका त्या मानाने झळकला नाही. कोकणात जलपर्यटन बहरत असताना लांजा तालुक्यात असणारी १३ धरणे ही लांजा तालुक्याच्या पर्यटनाच्या विकासाला पोषक ठरणार असून त्याचबरोबर येत्या काही वर्षांत लांजा तालुक्यात प्रकाशात आलेली आदिम संस्कृतीच्या पाऊलखुणा सांगणारी कातळशिल्पे तालुक्यातील पर्यटन बहरणार असल्याचे निर्देशक आहे.

सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेला लांजा तालुका समृद्ध निसर्ग, मंदिरे, ऐतिहासिक गढी, पुरातन लेणी, संस्कृती जपणारे वाडे या वैविध्यपूर्ण पर्यटनस्थळांनी समृद्ध आहे. मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणानंतर कोकणातील मध्यवर्ती ठिकाणी वसलेल्या लांज्याला विकासाची सर्वाधिक संधी आहे. याचे कारण लांजा शहराच्या भोवती वसलेल्या २०- २५ किलोमीटरच्या परिसरात तालुक्यातील १३ धरणांचा उपयोग करून धरण क्षेत्रात असलेल्या गावात कृषी पर्यटन केंद्रांची उभारणी होऊ लागली आहे. कृषीपर्यटन केंद्राची ही संख्या नियोजनपूर्वक वाढविता आली तर ‘ग्रामीण पर्यटन’ या संकल्पनेवर आधारित पर्यटन बहरायला वेळ लागणार नाही.

लांजा तालुक्यात कोकण रेल्वेची निवसर, आडवली, वेरवली, विलवडे ही ४ स्थानके असून याचा फायदा पर्यटनवृद्धीसाठी होऊ शकेल. त्याचबरोबर मुंबई-गोवा महामार्गाच्या मध्यवर्ती वसलेले लांजा हे गोवा, बेळगाव, कोल्हापूर, साताऱ्यापासून दोन ते चार तासांच्या अंतरावर असल्याने लांजा तालुका कृषी पर्यटन तालुका म्हणून विकसित झाल्यास मोठ्या संख्येने पर्यटक इकडे वळतील. या दृष्टीने खोरनिनको धरण परिसर वर्षा पर्यटनाचा नवा पर्याय म्हणून वेगाने विकसित होत असून या धरणाच्या चारही बाजूंनी लिंक रोडची निर्मिती झाल्यास पर्यटकांना सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेले स्वर्गसुख अनुभवता येईल. हा रोचक अनुभव घेण्यासाठी आंतरराष्ट्रीय पर्यटकांनाही आणता येण्यासारखी समृद्धी या खोऱ्यात आहे. अशाच पद्धतीने बेनी-खेरवसे धरण, महामार्गालगतचे पन्हळे धरण, कोंड्ये धरण, गवाणे व व्हेळ धरणांचा विकास व्हायला हवा.

कृषी पर्यटनासोबतच हर्दखळे, प्रभानवल्ली परिसरातील सातरांजण धबधबे, ऐतिहासिक डोलारखिंड, चौबेखिंड, प्रभानवल्ली गावातील गढी, बल्लाळ गणेश, तसेच तालुक्यातील थंड हवेचे ठिकाण माचाळ गाव, तेथील मुचकुंद ऋषींची गुहा, माचाळच्या पायथ्याशी वसलेले भारतातील पहिला बाॉम्ब बनविणारे क्रांतिकारक जी. अण्णा आठल्ये यांचे शिपोशी गाव, या गावातील ग्रामदेवतेच्या मंदिरात असलेली चंडदेवतेची दुर्मिळ मूर्ती, मठ गावातील प्रतिनरसोबाची वाडी म्हणून प्रसिद्धीस आलेले ‘अवधूतवन’ हे श्रीदत्तक्षेत्र, विसाव्या शतकातील प्रेमाचे प्रतीक म्हणून पुढे येण्याची क्षमता असलेले निवसर गावातील राघो-जाखाईचे स्मृती मंदिर, वेरळ गावातील भवानी शंकर पाध्ये यांचा ३६५ वर्षांपूर्वीचा चौसोपी वाडा, जावडे कातळवाडी येथील शैव व वैष्णव पंथीय लेणी, एकखांबी गणेश, कुव्याचा स्वयंभू गणपती, साटवली गावातील मुचकुंदी नदीच्या तीरावर वसलेला गढीवजा साटवली किल्ला, खानविलकर घराण्याची बेनी गावातील वैशिष्ट्यपूर्ण सदर इत्यादी वैविध्यपूर्ण पर्यटनस्थळांचा कासवगतीने विकास सध्या होत आहे. त्याकडे लक्ष देऊन तो जलदगतीने केल्यास लांजा तालुका ‘लवेबल लांजा’च्या नव्या रूपात रत्नागिरी जिल्ह्याच्या पर्यटनक्षेत्री केंद्रस्थानी राहू शकेल.

यासोबतच झाशीच्या राणीचे सासर म्हणून असलेल्या लांजा तालुक्यातील कोट गावात माचपठार नामक कातळसड्यांवर विपुल प्रमाणात कोरीव आणि देखण्या कातळशिल्पांचा समूह नुकताच सामाजिक कार्यकर्ते सुभाष लाड, आबा सुर्वे, पर्यटन अभ्यासक विजय हटकर यांनी प्रकाशात आणले. कोट गावाच्या पूर्वेकडे असलेल्या कातळसड्याला ग्रामस्थ माचपठार म्हणून संबोधतात. कोलधे गावातून कोट गावाकडे जाताना लागणाऱ्या सड्यावर पाष्टे कुटुंबीयांच्या एकत्रित जमिनी असून यालाच पाष्टे मंडळी माचपठार किंवा माचसडा म्हणतात. या ठिकाणी असलेल्या सड्यावर पाष्टे कुटुंबीयांनी शेतघरे बांधली असून पावसाळ्यानंतर पिकाची काढणी झाल्यानंतर झोडणी व मळणी करण्याचे काम तेथे केले जाते. ज्या ठिकाणी ग्रामस्थ शेतघरांशेजारी भात झोडतात, त्याच जागेवर अनेक चित्र विचित्र आकृत्यांचा म्हणजेच कातळशिल्पांचा अमूल्य खजिना आहे. गावकऱ्यांनी या पांडवकालीन आकृत्या असल्याचा समज करून घेतल्याने त्याचे संवर्धन केलेले नाही. परिणामी काही कातळशिल्पांची हजारो वर्षे ऊन-वारा-पावसाचे तडाखे खाल्याने झीज झाली आहे, तर काही शिल्पे सुस्थितीत असल्याचे निदर्शनास आले. या ठिकाणी राजापूर तालुक्यातील देवीहसोळ गावात आर्यादुर्गा या मंदिराच्या जवळ असलेल्या आयताकृती कातळशिल्पाप्रमाणे आयताकृती गूढ भौमितिक रचना, वाघाचे चित्र, पंजा तसेच विविध पक्षी, प्राणी, मासे यांच्या प्रतिकृती आहेत. साधारण १५-२० कातळशिल्पांचा समूह येथे असण्याची शक्यता आहे. पुरातत्त्वीयदृष्ट्या खूप महत्त्वाची आणि या भागातील आदिम मानवी समूह व त्यांची वस्तीस्थाने यांच्याबद्दल माहिती उपलब्ध होऊ शकेल, अशी कोटसह लांजा तालुक्यातील वाघ्रट, लिंबूचीवाडी, भडे, हर्चे, लावगण, जावडे, पुनस या गावातील सड्यांवरही कातळशिल्पे आहेत. मात्र त्यांचे तज्ज्ञांकडून वाचन होणे, अर्थ लावणे, त्यांचा कालावधी निश्चित करणे आवश्यक आहे. असे केल्यास कोकण प्रदेशाच्या इतिहासावर अधिक प्रकाश पडण्याची शक्यता आहे. पर्यटनदृष्ट्याही ही स्थळे विकसित केल्यास लांज्यासह जिल्ह्याच्या पर्यटन विकासालाही त्याचा हातभार लागेल.
- विजय हटकर
पर्यटन अभ्यासक,
लांजा - (संपर्क : 88066 35017)
- (लेखाच्या सुरुवातीचे छायाचित्र खोरनिनको धरणाचे. स्वर्गीय सुखाचा आनंद देणारे पर्यटनस्थळ म्हणून तो परिसर विकसित होत आहे.)
(कोकणातल्या कातळशिल्पांबद्दल विस्तृत माहिती देणारा लेख वाचा खालील लिंकवर…)
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड