
रत्नागिरी : महाराष्ट्र ग्राहक पंचायतीच्या रत्नागिरी जिल्हा शाखेची स्थापना झाली असून अध्यक्षपदी संदेश सदाशिव सावंत यांची निवड झाली आहे.
रत्नागिरीच्या रा. भा. शिर्के प्रशालेत जिल्हा शाखेच्या स्थापनेची सभा पार पडली. त्यामध्ये ही निवड झाली. सभेत आशीष अनंत भालेकर (सचिव), विलास घाडीगावकर (कोषाध्यक्ष0 आणि प्रमोद कोनकर (प्रसिद्धीप्रमुख) यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

सभेत संस्थेचे राज्य सदस्य आणि सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रा. एस. एन. पाटील यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, भारतीय ग्राहक चळवळीचे प्रणेते आणि ग्राहक पंचायत महाराष्ट्र संस्थेचे संस्थापक ग्राहकतीर्थ स्व. बिंदुमाधव जोशी यांनी स्थापन केलेल्या महाराष्ट्र ग्राहक पंचायतीच्या माध्यमातून राज्यातील २२ जिल्ह्यांत ग्राहक जागृतीचे कार्य सुरू आहे. ग्राहक पंचायतीचे कार्य कोकणात पोहोचविण्याच्या दृष्टीने जिल्हा तेथे संस्थेची शाखा स्थापन करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. सर्वसामान्य ग्राहक हा केंद्रबिंदू मानून काम करणाऱ्या ग्राहक पंचायतीची रचना, तत्त्वज्ञान आणि कार्यपद्धतीची ओळख रत्नागिरी जिल्ह्यातील विविध सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांना करून देण्याकरिता ग्राहक पंचायत काम करते. प्रत्येक तालुक्यात शाखा स्थापन व्हावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
यावेळी रा. भा. शिर्के प्रशालेचे मुख्याध्यापक श्री.चव्हाण यांनीही मार्गदर्शन केले. ग्राहक चळवळ पुढे नेण्याकरिता शक्यती मदत करण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
सभेला रत्नागिरीसह देवरूख आणि राजापूरमधील प्रतिनिधी उपस्थित होते.
रत्नागिरी जिल्ह्यातील सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते, ग्राहक चळवळीत काम करू इच्छिणाऱ्या कार्यकर्त्यांनी ग्राहक चळवळीशी जोडले जावे, असे आवाहन नूतन जिल्हाध्यक्ष संदेश सावंत (8379017768) यांनी केले आहे.


