बोरीवली : कवयित्री सौ. वीणा विश्वास चव्हाण यांच्या ‘अजूनही काही भावतं तिला’ या पहिल्या कवितासंग्रहाचे प्रकाशन ज्येष्ठ कवी आणि गीतकार प्रसाद कुलकर्णी यांच्या हस्ते नुकतेच बोरीवलीच्या प्रबोधनकार ठाकरे नाट्यगृहात झाले.
‘सौ. वीणा चव्हाण यांची कविता चिंतनशील आहे आणि ती सूक्ष्म अवलोकनातून जन्माला आलेली आहे,’ असे उद्गार या वेळी प्रसाद कुलकर्णी यांनी काढले. ‘कविता करू म्हणून करता येत नाही आणि करायची असते तेव्हा ती टाळू म्हणून टाळता येत नाही. तो सृजनाचा हुंकार असतो. वीणाताईंनी तो आपल्या शब्दांमध्ये अचूक पकडला आहे,’ असेही ते म्हणाले.
या प्रकाशन सोहळ्याला प्रसिद्ध लेखक, दिग्दर्शक राजेश देशपांडे, मोडीदर्पण या दिवाळी अंकाचे संपादक सुभाष लाड, ज्येष्ठ साहित्यिक अशोक लोटणकर, ज्येष्ठ कवयित्री योगिनी राऊळ आणि कवी, संपादक गीतेश शिंदे आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. अभिनेते प्रफुल्ल सामंत, अभिनेते, नृत्य दिग्दर्शक अनिल सुतार आणि कवी संजय गुरव आदी मान्यवरही या वेळी उपस्थित होते. दिनेश मोरे यांनी या सोहळ्याचे सूत्रसंचालन केले. कार्यक्रमात त्यांनी सौ. वीणा चव्हाण यांची छोटीशी मुलाखतही घेतली. या सोहळ्याचे नियोजन कवी विराज चव्हाण यांनी केले होते.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

