रत्नागिरी : केंद्र शासनाच्या पर्यावरण, वने व वातावरण बदल खात्याने पर्यावरण संवेदनशील क्षेत्र घोषित करण्यासाठी अधिसूचना प्रसिद्धीसाठी दिली आहे. त्यानुसार रत्नागिरी जिल्ह्यातील ३११ गावे संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आली आहेत.
चिपळूणमधील ४४, खेडमधील ८५, लांजा तालुक्यातील ५०, राजापूरमधील ५१ आणि संगमेश्वरमधील ८१ अशी एकूण पाच तालुक्यातील ३११ गावे पर्यावरण संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आली आहेत. या मसुदा अधिसूचनेत नमूद केल्यानुसार क्षेत्रातील ज्या स्थानिक रहिवाशांवर परिणाम होणार आहे, त्यांनी साठ दिवसांच्या आत केंद्र शासनाच्या पर्यावरण वने व वातावरण बदल मंत्रालयाकडे (इंदिरा पर्यावरण भवन, जोरबाग रोड, नवी दिल्ली ११०००३) आक्षेप नोंदविणे आवश्यक आहे.
महाराष्ट्र राज्य जैवविविधता मंडळ (नागपूर) चे सदस्य सचिव तथा प्रधान मुख्य वनसंरक्षक यांना केंद्र शासनाचे पर्यावरण, वने व वातावरण बदल मंत्रालयाचे अधिसूचना पत्र प्राप्त झाले आहे. त्यानुसार चिपळूण, खेड, राजापूर, रत्नागिरी उपविभागीय अधिकारी तसेच चिपळूण, खेड, लांजा, राजापूर आणि संगमेश्वरच्या तहसीलदारांना ही अधिसूचना स्थानिक पातळीवर प्रसिद्ध करून अधिसूचनेबाबत हरकतीचा अहवाल सादर करण्याबाबत निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांनी कळविले आहे.
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

