कवी बदिउज्जमा ‘खावर’ कोकणातले महान कवी – शायर आणि विचारवंत! उर्दू तसेच मराठी भाषेवर समान प्रेम करणारे एकमेव कवी, शायर! २६ सप्टेंबर १९९० रोजी कर्दे, दापोली येथे त्यांचे निधन झाले. म्हणजेच २६ सप्टेंबर हा त्यांचा स्मृतिदिन.
त्यांच्या दफन विधीला मला सामील नाही होता आले. कारण त्याच दिवशी माझ्या आईला देवाज्ञा झाली आणि मी यतीम झालो!
यापूर्वी खावर सरांच्या प्रत्येक स्मृतिदिनानिमित्त वृत्तपत्रांमध्ये तसेच अलीकडे सोशल मीडियावर लेख लिहीत आलोय. दापोलीत काही जाहीर साहित्यिक कार्यक्रमसुद्धा आयोजित केले.
दापोलीचे नामवंत कवी सुदेश मालवणकर यांनी कवी खावर यांच्या स्मरणार्थ अलीकडेच एक प्रयत्न करून पाहिला, यश नाही मिळाले. असो.
गजल सागर प्रतिष्ठानच्या वतीने प्रकाशित ‘समग्र खावर’ या पुस्तकामधून एक गजल देत आहे,
रानात हवा गाते…
रानात हवा गाते
मल्हार तुझ्यासाठी
बागेत फुलांचा हा
शृंगार तुझ्यासाठी
पत्येक नवा मौसम
फुलवून तुला जातो
घेतात ऋतू सारे
आकार तुझ्यासाठी
जाशील तिथे गात्रे
न्हातील उजेडाने
कोठेच नसे आता
अंधार तुझ्यासाठी
उरली न मुखी माझ्या
भाषाच नकाराची
आंतून सदा येतो
होकार तुझ्यासाठी
मी काय तुला सांगू,
येताच समोरी तू
देहात कसा होतो
झंकार तुझ्यासाठी
प्रेमात कधी कुठल्या
हाकेस नको टाळू
हा एक असे ‘खावर’
आधार तुझ्यासाठी
खावर यांच्या स्मृतीस आदरांजली.
- इक्बाल शर्फ मुकादम
दापोली
(99206 94112)
कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड
Follow Kokan Media on Social Media

