मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे १२ जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गत येणाऱ्या १२५ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. आता पाच फेब्रुवारीऐवजी सात फेब्रुवारी रोजी मतदान होणार असून, सात फेब्रुवारीऐवजी नऊ फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाने या जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी १३ जानेवारी २०२६ रोजी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला होता. त्यानुसार नामनिर्देशनपत्र दाखल करणे, नामनिर्देशनपत्र मागे घेणे, चिन्हवाटप आणि निवडणूक लढविणाऱ्या अंतिम उमेदवारांची यादी प्रसिद्ध करणे इत्यादी टप्प्यांची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यापुढील मतदान, मतमोजणी आणि निवडून आलेल्या सदस्यांची नावे राजपत्रात प्रसिद्ध करणे हे टप्पे शिल्लक आहेत. सर्वोच्च न्यायालयाने या निवडणुकांसाठी ३१ जानेवारी २०२६च्या पुढे फक्त दोन आठवड्यांची मुदतवाढ दिली आहे; परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे २८ जानेवारी २०२६ रोजी अपघाती निधन झाल्यामुळे राज्य शासनाने राज्यात ३० जानेवारी २०२६पर्यंत दुखवटा जाहीर केला आहे. या कालावधीचा विचार करून जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या कार्यक्रमातील उर्वरित टप्प्यांमध्ये बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार संबंधित जिल्हाधिकारी सुधारित निवडणूक कार्यक्रमाची सूचना ३१ जानेवारी २०२६ रोजी प्रसिद्ध करतील. आता सात फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच या वेळेत मतदान होईल. त्यामुळे जाहीर प्रचाराची समाप्ती पाच फेब्रुवारी रोजी रात्री १० वाजता होईल. संबंधित ठिकाणी नऊ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी १० वाजता मतमोजणी सुरु होईल. निकाल जाहीर झाल्यानंतर संबंधित ठिकाणची आचारसंहिता संपुष्टात येईल. निवडून आलेल्या सदस्यांची नावे शासन राजपत्रात ११ फेब्रुवारी २०२६पर्यंत प्रसिद्ध केली जातील.
Follow Kokan Media on Social Media

