महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या चौसष्टाव्या हौशी राज्य मराठी नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत रत्नागिरीत स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृहात १२ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी कोल्हापूरच्या फिनिक्स क्रिएशन्स संस्थेने वसुभूमी हे नाटक सादर केले.
भरतभूमीपासून खूप दूर असलेले ‘वसुभूमी’ बेट चहूबाजूंनी सागराने वेढलेले असते. निसर्गाला/वृक्षाला देव मानणारे लोक तेथे राहतात. अनेक वर्षे या बेटाची कोणाला माहिती नसल्याने बेटावर आक्रमण झालेले नसते, मात्र बेट काबीज करण्याच्या हालचाली ‘घोरीं’कडून सुरू झाल्या आहेत, वसुभूमीला बाहेरच्या विचारधारेचा स्पर्श झाला आहे, छिद्रे शोधली पाहिजेत. आपण पौरजनांनी सावध असले पाहिजे, असे ‘कालात्यैत’ गुरूंचे शिष्य ‘दास्यबाबा’ जमलेल्या पौरजनांना सांगतातय दास्यबाबांचे शिष्य व वसुभूमीचे प्रमुख म्हणून घेवारीरा’ व प्रधान सांझर हेही उपस्थित असतात. दास्यबाबांनी प्रयोग करून कुरको नावाच्या वनस्पतीपासून एक औषध बनविलेले असते, जे मृत्यूपश्चातही जगण्यासाठी उपयुक्त ठरते. त्याचा पहिला प्रयोग दास्यबाबा घेवारीरानवर करण्याचे ठरवतात. मात्र ‘हेरा’ व ‘दाता’ हा प्रयोग आमच्यावर करा, असे सुचवितात. दास्यबाबा ते नाकारतात. याचा त्यांना अपमान वाटतो आणि हेच पुढे विनाशाचे कारण ठरते.
वसुभूमीवर याअगोदर घोरी ने आक्रमण केले होते, पण वसुभूमीने युद्धकौशल्याने ते परतवून लावले होते. त्यावेळी पकडलेला एक सैनिक हेरा आणि दाता यांना भेटतो, त्यांच्या विचार/बुद्धीवर ताबा घेतो व दास्यबाबा व घेवारीरानच्या विरोधात भडकवतो. दास्यबाबांच्या शोधाची वनस्पती कोणती ती समजावून घ्या, असे सुचवतो. ते दोघे सूडाने पेटलेले असतातच. ते दास्यबाबांकडे जातात. त्यांना वनस्पतीचे नाव विचारतात. दास्यबाबा सांगत नाही, म्हणून त्यांच्यावर ते हल्ला करतात अखेर दास्यबाबा औषधी वनस्पतीचे नाव सांगतात. नाव कळल्यावर हेरा त्यांच्यावर जिवघेणा हल्ला करतो, दास्यबाबा त्यांना सांगतात, मी तुम्हाला वनस्पतीचे नाव सांगितले मात्र त्यावरची प्रक्रिया सांगितली नाही आणि सांगणारही नाही. दास्यबाबा गळ्याभोवती स्वतःच वार करून घेऊन आपले जीवन संपवतात.
दास्यबाबा व मुरा यांच्या मृत्यूस कारणीभूत आरोपींना शोधण्याचे आदेश दिले जातात. चौकशीअंती घेरा व दाता हेच दोघे दास्यबाबा व मुराच्या मृत्यूस कारण आहेत, असे पत्र सापडते, ते घोरीच्या सैनिकानेच लिहिलेले असते. तिघांना मृत्युदंडाची शिक्षा होते. मात्र त्याअगोदरच घोरीच्या सैनिकाने वसुभूमीसंबंधी गुप्त बातम्या मिळवून, त्या आपल्या देशात कळवलेल्या असतात, त्यानुसार घोरीकडून वसुभूमीवर आक्रमण होते. वसुभूमीचा पूर्णतः ऱ्हास होतो.
प्रकाश योजना – रोहन घोरपडे, नेपथ्य शिवप्रसाद पोळ, विजयंत शिंदे, पार्श्वसंगीत -डॉ. राजश्री खटावकर, साहसदृश्ये आदित्य ऋषिकेश देशमो, वेषभूषा, रंगभूषा, नृत्यदिग्दर्शन कुंभार यांची आहेत.
नेपथ्याची रचना रंगमंचावर वेगवेगळ्या भागात प्रकाश व्यवस्थेचा वापर करून करण्यात आली आहे. नाटकात उत्सव प्रसंगी पौरजनांचे नृत्य त्याचे संगीत काळाला साजेस बनविले आहे, “ओला हो जना” हे त्यांचे ‘घोषवाक्य’ वारंवार वापरण्यात आले आहे. विषयाचे गांभीर्य लक्षात घेता काही गोष्टी प्रतीकात्मक दाखवल्या गेल्या आहेत. इतर तांत्रिक बाजू गरजेनुरूप, प्रसंगानुरूप केल्या आहेत.
दास्यबाबाची मध्यवर्ती भूमिका लेखक प्रमोद पुजारी यांनी उत्तम संवादफेक करून संयतपणे साकारली आहे. घेवारीरान ची भूमिका रोहन सावळे यांनी नेटकी साकारली आहे. हेरा-दाता या बंधूंची भूमिका आदित्य कुंभार, ओंकार माळी यांनी आक्रमकपणे वठवली आहे, बाकीच्यांच्याही भूमिका प्रसंगानुरुप यथायोग्य आहेत.
कोणत्याही भूमीमध्ये दोन संस्कृती, दोन विचारधारांचे लोक, सत्ता एकत्र येतात तेव्हा वर्चस्ववाद सुरू होतो. याच वर्चस्ववादामुळे अनेक संस्कृती आणि सत्ताधीशांचा नाश झाला आहे. वर्चस्ववादात कोण्या एकाची माघार किंवा ऱ्हास ठरलेलाच असतो. अद्यापही काही देशांमध्ये तो सुरू आहे. जे देश आपली संस्कृती आणि विचारांपासून भरकटतात त्यांचा ऱ्हास निश्चित होतो, असा संदेश हे नाटक देते.
श्रेयनामावली
नाटक : वसुभूमी
संस्था – फिनिक्स क्रिएशन्स, कोल्हापूर
निर्मिती : फिनिक्स क्रिएशन्स्, कोल्हापूर
लेखक : प्रमोद पुजारी
दिग्दर्शक : संजय मोहिते
नेपथ्य : शिवप्रसाद पोळ, विजयंत शिंदे
प्रकाशयोजना : रोहन सुनील घोरपडे
संगीत दिग्दर्शन : ऋषिकेश देशमाने
रंगभूषा व वेशभूषा : डॉ. राजश्री खटावकर
पार्श्वसंगीत : अभिजित लावंड
साहसदृश्ये : आदित्य कुंभार
नृत्यदिग्दर्शन : डॉ. राजश्री खटावकर
रंगभूषा सहाय्यक : भूपेंद्र चारी
रंगमंच व्यवस्था : टीम फिनिक्स
जाहिरात डिझाइन : ओंकार माळी
विशेष सहकार्य : जीवश्री फॅशन्स, मिलिंद अष्टेकर, जावेद शेख
विशेष आभार : विनय गोखले, सुमंत शिंदे
श्रेयनामावली
दास्यबाबा : प्रमोद पुजारी
घेवारीरान : रोहन सावळे
हेरा : आदित्य कुंभार
दाता : ओंकार माळी
सांझर : जीवन पाटील
घोरी सैनिक : प्रमोद फडतरे
भैरी : वैष्णव जाधव
गृहस्थ : आविष्कार कांबळे
मुरा : ऋत्विक भाट
सेंबी : आशिका चौधरी
धामा : ज्ञानेश्वरी शिरसेकर
स्त्री : पद्मावती राऊत
अंघोरी बहिणी : याज्ञी नानिवडेकर, सानिया शेख
गायक : विजयंत शिंदे
इतर : सुशांत नरूटे, आदित्य गुर्जर, हेमा कारंडे, आयुष्का गावडे, प्रणोती कांबळे, समरवीर नांगरे, मुकेश मछले, सिध्दांत धनवडे, संजीवनी सरोळकर, नूपुर पवार, संजना परब, शरद पवार, आराध्या जाधव, सोफिया शेख, श्वेता दिंडे, तक्ष उराडे, अतिफ काझी, यास्मीन शेख, आरती जाधव
(शब्दांकन : प्रसाद वैद्य, ९४२०१ ५५३३३)





कोकण मीडियाला विविध सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली दिलेल्या पर्यायांवर क्लिक करा.
टेलिग्राम, व्हॉट्सअॅप, यू-ट्यूब, ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम, इन्स्टामोजो, गुगल प्ले बुक्स, गुगल न्यूज, बुकगंगा, साउंडक्लाउड

