रत्नागिरीत अलीकडेच पर्यटनविषयक परिषद झाली. कोकणातील पर्यटनाला हे किती आणि कसा वाव आहे, यावर या परिषदेत ऊहापोह झाला. अशा तऱ्हेच्या परिषदा अधूनमधून होत असतात, पण त्यातून कृतिशील काम होत नाही, असे गेल्या आठवड्यातील संपादकीयामध्ये नमूद केले होते. कारण उपाय कितीही सुचविले गेले तरी ते प्रत्यक्षात आणण्याच्या दृष्टीने कार्यवाही करणे आवश्यक असते. कोणत्याही क्षेत्रात अनेक व्यक्ती आपापल्या परीने व्यवसायाला चालना देण्यासाठी, तो वाढविण्यासाठी काही उपाय शोधत असतात. त्यावर काम करत असतात आणि व्यक्तिगत पातळीवर यशस्वी होत असतात. पर्यटनाचे क्षेत्र असे एकट्याने काम करण्याचे नाही. त्याला सामूहिक प्रयत्नच आवश्यक असतात. त्यामुळे परिषदांमध्ये कितीही मुद्दे मांडले गेले तरी त्यातील प्रत्यक्षात किती येतात, यावरच या परिषदांचे फलित अवलंबून असते. रत्नागिरीच्या परिषदेत उपस्थित राहिलेल्या लांज्याातील दोघा तरुणांनी मात्र त्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले आहेत.
विजय हटकर आणि नितीन कदम या दोघांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने रत्नसिंधू नावाची तूर्त तरी आभासी संस्था सुरू केली आहे. नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर लांजा, राजापूर आणि रत्नागिरी तालुक्यातील काही देवीक्षेत्रांना भेट देण्याची एक दिवसाची सहल त्यांनी आयोजित केली आहे. त्यासाठी एका मिनीबसची व्यवस्था केली आहे. त्याकरिता येणारा खर्च पर्यटकांमध्ये विभागला जाणार आहे, त्यांचा हा प्रयत्न अत्यंत छोटासा असला तरी तो नक्कीच दिशादर्शक आहे. पर्यटनाच्या वाढीच्या दिशेने टाकलेले ते एक छोटेसे पाऊल आहे, पण त्यातून अनेक गोष्टींना चालना मिळणार आहे. कारण सहल जाहीर केल्यानंतर अगदी दोन दिवसांत त्यांना चांगलाच प्रतिसाद मिळाला. त्यामध्ये मुंबई आणि गोव्यातील काही जणांनीही सहलीत सहभागी होण्याची इच्छा दाखविली आहे. त्यावरून अशा वेगळ्या प्रयत्नांची किती गरज आहे, हेही लक्षात येते.
अनेक जण पर्यटनाला जातात मोठमोठ्या आणि प्रसिद्ध ठिकाणांना भेट देत असतात. त्यांच्यासाठी टूर ऑपरेटर्स काम करतात. देश-विदेशात अशा सहलींचे आयोजन केले जाते. पण अशी जगभ्रमंती करणाऱ्या पर्यटकांनी आपल्याच परिसरातील अनेक ठिकाणी पाहिलेली नसतात. ती त्यांना पाहायची नसतात, असे नव्हे. पण त्या ठिकाणापर्यंत घेऊन जाणाऱ्या मार्गदर्शकाचा अभाव असतो. ती ठिकाणे लौकिकदृष्ट्या प्रसिद्ध नसली तरी पर्यटनाचा मूळ हेतू साध्य करण्याची क्षमता या ठिकाणांमध्ये असते. कोकणातील प्रत्येक गावच मुळात सुंदर आहे. या गावांकडे जाणारे रस्ते सृष्टिसौंदर्याचा मनमुराद आनंद देतात. त्यामुळे प्रत्येक गावातच पर्यटनाला जाणे खूप आनंदाचे असू शकते. पण अशा ठिकाणांची प्रसिद्धी पर्यटनस्थळ म्हणून होत नसते. हेच हेरून रत्नसिंधू संस्थेने नवरात्रोत्सवाचे औचित्य साधून तीन तालुक्यांमधील देवीच्या मंदिरांना भेट देण्यासाठी धार्मिक सहलीचे आयोजन केले आहे. सहलीत सहभागी होणाऱ्या होणाऱ्यांनी ही ठिकाणे पूर्वी पाहिली असतील किंवा नसतीलही. पण सहलीच्या निमित्ताने संबंधित गावाविषयी माहिती अनेकांपर्यंत पोहोचेल. पण अशा तऱ्हेच्या छोट्या सहलींचे आयोजन करण्याची एक दिशा अनेकांना मिळेल. ज्यांनी ही सहल आयोजित केली आहे, त्यांच्याकडे सहलीच्या दृष्टीने म्हणून कोणती साधने नाहीत. त्यांचे हॉटेल नाही. त्यांची स्वतःची बसही नाही. त्यांनी स्वतंत्र मार्गदर्शकही नेमलेला नाही. हे दोघेच त्या मंदिरांची माहिती पर्यटकांना देणार आहेत. कल्पकता असेल तर पर्यटनाच्या क्षेत्रात काय करता येऊ शकते, याचे हे अत्यंत छोटे उदाहरण आहे, म्हणूनच ते मार्गदर्शक आहे.
- प्रमोद कोनकर
(संपादकीय, साप्ताहिक कोकण मीडिया, ८ ऑक्टोबर २०२१)
(साप्ताहिक कोकण मीडियाचा ८ ऑक्टोबरचा अंक डाउनलोड करण्यासाठी, तसेच मागील संग्राह्य अंक वाचण्यासाठी ई-मॅगझिन विभागाला भेट द्या. त्यासाठी येथे क्लिक करा.)

साप्ताहिक कोकण मीडिया – ८ ऑक्टोबर २०२१ चा अंक
या अंकात काय वाचाल?
संपादकीय : पर्यटनवाढीचा रत्नसिंधू मार्ग
https://kokanmedia.in/2021/10/08/skmeditorial8oct/
मुखपृष्ठकथा : महिलांनीच द्यावी नवरात्रोत्सवाला नवी दिशा – रामकृष्ण विनायक अभ्यंकर यांचा लेख
पावसमधील नवरात्रोत्सव : ज्येष्ठ पत्रकार अरविंद कोकजे यांनी लिहिलेला स्मरणरंजनपर लेख
एका आयएएसची यशोगाथा : मांडकी (ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) येथील प्रथमेश अरविंद राजेशिर्के यांचा यूपीएससी परीक्षेत देशपातळीवर २३६वा क्रमांक आला. त्यांची यशोगाथा मांडणारा लेख…
धोंडीआक्का : राजेश जगन्नाथ गोसावी यांचा ललित लेख
पंचमहाभूत उपचार पद्धती : डॉ. प्रणव अशोक प्रभू यांचा लेख
मुखपृष्ठ बघून पुस्तक समजत नाही… : किरण आचार्य यांच्या ‘चौकोनी वर्तुळ’ या सदरातील पुढचा लेख